सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करणार
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या आहेत. मात्र या कंपन्यातून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण, वायु प्रदूषण होत आहे.त्याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून नागरिकांचे आयुष्यमान कमी होत आहे, त्यामुळे अशा जलप्रदूषण व वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर वेळीच कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. नाहीतर भोपाळ येथे गॅस गळती होऊन खूप मोठी दुर्घटना झाली तेथे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला तशीच घटना उरणमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही.
उरण तालुक्यातील नागांव समुद्रकिनारी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून कार्यरत असलेले ओएनजीसी कंपनीमधून मोठ्या प्रमाणात हवेचे व जल प्रदूषण सर्रासपणे होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने सदर कंपनीवर व तेथील मुजोर अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागांव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांनी पत्रव्यवहाराद्वारे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री उदय सामंत, कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, प्रदुषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य, तहसिलदार उरण आदी ठिकाणी वैभव कडू यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे. लवकरच ओएनजीसीच्या जल प्रदूषण व हवेच्या प्रदुषणापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी वैभव कडू हे ओएनजीसी कंपनीच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
नागांव समुद्रकिनारी ओएनजीसी कंपनी कार्यरत असून ही कंपनी नागांव व म्हातवली या दोन ग्रामपंचायत हद्दीत मोडते.या नागाव समुद्रकिनारी असलेल्या कंपनीतून अधून मधून सल्फर युक्त एसओ टु (SO2) व एच टु एस (H2s) केमीकल तसेच नाफ्ता पाण्यातून, नाल्यावाटे बाहेर समुद्रात सोडले जाते. अनेकदा हे केमिकलयुक्त पाणी गावात नाल्यावाटे पसरते. हे खराब सांडपाणी प्राणी पशु, पक्षी, नागरिक यांच्यासाठी जीवघेणे आहे. या वारंवार सोडलेल्या केमीकल युक्त पाण्यामुळे समुद्रातील अनेक मासे मृत पावलेले आहेत तर समुद्रात सर्वत्र तेल पसरून पाणी काळ्या रंगाचे होऊन गढूळ झाले आहे. तर या ओएनजीसी प्रकल्पामधून तयार होणारा (सोडला जाणारा) हायड्रोजन सल्फाईड वायू नेहमी हवेत सोडला जातो. त्यामूळे नागांव, म्हातवली, काठे आळी, अंबिकावाडी, चारफाटा, ओएनजीसी रोड परिसर, उरण शहर परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. या परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याला गॅसचा विशिष्ट वास येत आहे आणि तेच पाणी नागरिक पीत आहेत. त्यामुळे त्यांना श्वसनाचे, अर्धांग वायु यासारखे अनेक गंभीर रोग होतात. नाल्यातून सोडल्या जाणाऱ्या केमिकल युक्त पाण्याला कधीही आग लागून खूप मोठी दुर्घटना घडू शकते. हवेतून व जल प्रदूषणातून निघणाऱ्या या प्राणविघातक रसायनामुळे उरणचा भोपाळ होईल की काय? अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे. हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना आपल्या घराचे खिडक्या दरवाजे बंद करून घरात बसावे लागत आहे.
या परिसरात ओएनजीसी प्रकल्पाने नुकताच कोणतीही परवानगी न घेता हजारो झाडांची कत्तल केली आहे. मात्र, निसर्ग समृद्ध करण्यासाठी कुठेही कंपनी प्रशासनाने वृक्षारोपण केलेले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ओएनजीसी प्रकल्पाचे काम सुरु आहे. सन 2006 मध्ये व 3 सप्टेंबर 2019 मध्ये मोठ्या प्रमाणावर नाफ्ता तेल (रसायन) ओएनजीसी कंपनीने नाल्यात सोडले होते ते पाणी नागांव गावात आले होते व मोठी आग लागली होती. या घटनेत जीवितहानी सुद्धा झाली होती. घरातील कमवता माणूस गमावल्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. गेल्या काही दिवसापासून दिवसरात्र सल्फर सदृश्य रबर एच टु एस (H2s,sO2) जळाल्याचा वास नागरिकांना मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे नागरिक घरे खिडक्या, दरवाजे बंद करून घरातच राहत आहेत. अनेकांना घरात राहणेही अवघड झाले आहे. कंपनीच्या प्रदुषणामुळे श्वास जड होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, हृदयाचे रोग, श्वसनाचे रोग या सारख्या आजारात वाढ झाली आहे. जल प्रदूषण तसेच हवेच्या प्रदूषणामुळे उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? असे सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत. त्यामूळे ओएनजीसी कंपनीतून हवेचे प्रदूषण व जल प्रदूषण होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांनी पुढाकार घेतला आहे.