• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नेरळ ग्रामपंचायतने नागरी समस्यांचे बॅनर हटविल्याने उलटसुलट चर्चा

ByEditor

Aug 19, 2023

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाढते गृहप्रकल्प पाहता व त्यामध्ये नेरळ ग्रामपंचायतीचे नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मात्र नेरळमधील रहिवाशांना दैनंदिन समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. त्या दैनंदिन समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना उद्धव गटाचे नेरळ उप शहरप्रमुख संदीप उतेकर यांनी एक बॅनर नेरळ बाजारपेठेतील असलेल्या चौकात व नाक्यांवर बॅनर लावले होते. परंतू उतेकर यांनी संबंधित बॅनर लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याचे कारण पुढे करत नेरळ ग्रामपंचायतीकडून उतेकर यांनी नागरी समस्यांचे लावलेले बॅनर काढण्यात आले असुन, सदर बॅनर हे जप्त करण्यात आले आहे. सदर बॅनर हटविण्यात आल्याने मात्र जनसामान्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शिवसेना उद्धव गटाचे नेरळ उप शहरप्रमुख संदीप उतेकर यांनी आपल्या राजकीय पक्षाचे किंवा पदाचा उल्लेख न करता एक रहिवाशी म्हणून नागरी समस्यांचे बॅनर हे नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व प्रमुख नाक्यांवर लावले होते. सदर बॅनरवर नेरळ ग्रामपंचायतीकडून रहिवाशांना होणाऱ्या कमी दाबाच्या पाणी पुरवण्यामुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याचे, ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याबाबत व नेरळमधील विविध भागातील रस्त्यांवरील बंद असलेल्या पथदिवे तसेच औषध फवारणी होत नसल्याने व तुंबलेल्या गटारातील घाणी व घाणीच्या पाण्यामुळे डासांचा वाढता प्रादुर्भाव आदी नागरी समस्यांबाबत नेरळ ग्रामपंचायतला आवाहन करत नागरी समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र, सदर बॅनर बाजारपेठ भागात लागल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतने बॅनर काढून जप्त करण्याची कारवाई केली असल्याने, यासंदर्भात संदीप उतेकर यांनी बॅनर का काढण्यात आले याचा खुलासा करण्या संदर्भात नेरळ ग्रामपंचायतीकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. तर नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाताई पारधी यांना पत्रकारांनी सदर उचलण्यात आलेल्या बॅनर संदर्भात विचारणा केली असता, संदीप उतेकर यांनी सदर बॅनर लावण्यासाठीची परवानगी ही नेरळ ग्रामपंचायतीकडून घेतली नसल्याचे कारण पुढे केले आहे.

मात्र, या आधी लागलेल्या बॅनर संदर्भात त्या त्या राजकीय पुढाऱ्यांनी नेरळ ग्रामपंचायतीची परवानगी घेतली होती का? की नागरी समस्या मांडल्यामुळेच नेरळ ग्रामपंचायतीने परवानगीचे कारण पुढे करत सदर नागरी समस्यांचे बॅनर काढले आहे का? असे अनेक उपस्थित प्रश्नांनुसार जनसामान्यात उलटसुलट चर्चा मात्र सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!