• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनच्या अकरा गावांत एसटी नाही; लांब पल्ल्याच्या बसेसना कायमचा ‘स्टॉप’

ByEditor

Aug 24, 2023

धनगरमलई मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय

गणेश प्रभाळे
दिघी :
एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील गावांना शहराकडे जोडणारी मुंबई एसटी गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे.

धनगरमलई मार्गे म्हसळा ते मुंबई असा प्रवास येथील सालविंडे, वरवटणे, धनगरमलई, कासारकोंड, नागलोली मधलीवाडी, नागलोली, नागलोली नवीवाडी, देवखोल, बोर्ला, बोर्ला रसाळवाडी, वावेपंचतन अशा अकरा गावांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून परतणाऱ्या प्रवाशांना एक हि गाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तीन वर्षापूर्वी याच मार्गावरून सर्वा-मुंबई, दिवेआगर-मुंबई व श्रीवर्धन-मुंबई या तीन गाड्यांचा प्रवास नियमित व सुरळीत सुरू होता. कारण येथील अनेकजण कामानिमित्त मुंबईस्थित असल्याने कित्येक वेळा या आडमार्गावर मिळणारी एसटीची सुविधा ही प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत होती.

राज्याच्या एका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत एसटी पोहचली आहे. मात्र, प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एसटी बंद असल्यामुळे या गावातील प्रवाशांना मुंबई जायचे असेल तर बोर्लीपंचतन किंवा म्हसळा बस स्टॅडमध्ये यावे लागते. वेळेत गाडी पकडण्यासाठी रिक्षा किंवा खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. गेली तीन वर्ष सातत्याने मुंबई गाडीसाठी मागणी होत असुन, लवकरात सेवा सुरु करण्यात यावी व कायम स्वरूपी सुरु रहावी अशी मागणी येथील प्रवाशी वर्गाकडून होत आहे.

या भागातील गेली तीन वर्ष बंद असणारी मुंबईकडे जाणारी एसटी सेवा मागणीनुसार पुढच्या आठवड्यात सुरु करण्यात येईल.

महेबुब मनेर,
आगार प्रमुख, श्रीवर्धन.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!