सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था; सुलभ शौचालयासाठी समर्थ नगर, दर्यानगरवासियांची मागणी
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेसाठी विविध अभियान राबविण्यात येतात. मात्र, दिघी येथे शौचालय अभावी स्वछता अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
या स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्यातील एक हजार 832 गावांपैकी एक हजार 11 गावे ‘हागणदारी मुक्त अधिक होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे. मात्र, आजही दिघी सारख्या गावामध्ये स्वच्छतेचा अभाव असून, हागणदारी मुक्त अधिक होण्यासाठी वैयक्तिक शौचालयासोबत सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत. यामुळे आता स्वच्छतेसाठी शासनानी देखील ग्रामस्थांना सहकार्य करण्याची अपेक्षा आहे.
गावात शौचालयाची सुविधा नसून त्या वापरासाठी पाणी, वीज याची सोय नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत शोषखड्डा आणि अन्य कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा येथील प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, वास्तवात येथील सार्वजनिक शौचालयाची मोडतोड होऊन तिथे पाणी आणि विजेची गैरसोय असल्याने ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागरिकांकडून अद्याप प्रात:विधी उघड्यावर आटोपले जात आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही बिकट होत आहे.
सुरुवातीला स्वच्छता अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शासनाकडून आजही स्वच्छतेसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, यासाठी येथे कोणत्याही प्रकारची जनजागृती करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरुपाची तयार करावी, अशी मागणी होत आहे.
दिघी ग्रुपग्रामपंचायत समोरील वस्तीमध्ये महिलांसाठी पाणी पुरवठा व विजेची सुविधांसह सार्वजनिक शौचालय बांधून मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जितेश बेंडूक, रहिवासी.
सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे समर्थ नगर, दर्या नगर येथील नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागते. शौचालयाअभावी महिलांची कुचंबणा सुरू आहे.
परशुराम पायकोळी
तालुका अध्यक्ष अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती.
शौचालयाच्या मागणीनुसार तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
अनंतकुमार सुळ, ग्रामसेवक.