• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कासु ते कोलाड मार्गावर खड्डयांचे साम्राज्य! प्रवाशांचे हाल

ByEditor

Aug 28, 2023

कोलाड मुख्य चौकात जीवघेणा खड्डा; गणपती सणापूर्वी खड्डे भरण्याची मागणी

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कासू, नागोठणे ते कोलाड तिसे या दरम्यान ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. चालकांना वाहन चालविणे जिकरीचे बनले असून मोठी वाहतूक आणि रहदारी असल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. परिणामी प्रवासी वर्गात संतप्त वातावरण आहे. कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मुख्य चौकात देखील भला मोठा खड्डा प्रवाशांच्या जीव घेण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते आहे, त्यामुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे.

गेली सतरा वर्ष रखडलेल्या या महामार्गाच्या कामात शासनाने करोडो रुपये खर्च केले मात्र, कोकणी माणसांना मार्ग तयार करून देण्यास सरकार अपयशी ठरत आहे. बारा तेरा वर्षात तब्बल दोन हजार पाचशेहून अधिक प्रवाशांचा जीव गेला आहे. त्यामुळे गणपती सणापूर्वी ठिकठिकाणी पडलेले खड्डे भरून महामार्गाची दुरुस्ती करण्यात येणार म्हणून राज्याचे बांधकाम मंत्री यांनी २७ ऑगस्टपासून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. एक लेन पूर्ण करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे परंतु या मार्गावरील कासू ते इंदापूर दरम्यानच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी मंत्री महोदय काळजीपूर्वक महामार्गाचा पाहणी दौरा करत आहेत मात्र कोलाड आंबेवाडी नाक्यावरील खड्डे मंत्री महोदयांना दिसत नाहीत का? आणि ठेकेदार देखील या खड्ड्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कोलाड आंबेवाडी ग्रामस्थ तसेच प्रवाशी वर्गासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महामार्गावरील पांडापूर, आमटेम, नागोठणे, वाकण, सुकेळी, खांब, कोलाड, तिसे गावाचे हद्दीपर्यंत रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे प्रवासीवर्ग व वाहनचालकांना मोठ्या जाचाला सामोरे जावे लागते आहे. या खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास करताना प्रवासी वर्गाचे जीव अगदी मेटाकुटीला येत आहेत. तसेच कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मुख्य चौकात तसेच रहदारीच्या मार्गावर भला मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात कोणाचा तरी जीव गेल्यावरच तो खड्डा भरला जाईल का? असा संतप्त सवाल केला जात आहे. या मार्गाच्या कामासाठी कोकणातील पत्रकारांनी अनेक आंदोलन केली बोंबाबोंब केली तरी देखील सरकारला कोकणातील जनतेशी काही घेणेदेणे नाही. गेली अनेक वर्ष रखडलेल्या या मार्गाच्या कामासाठी २७ ऑगस्ट रोजी याच मार्गावरील पळस्पे ते लांजा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत जागर यात्रा सुरू केली आहे तर दुसरीकडे बांधकाम मंत्री येतात पाहणी करून निघून जात आहेत मात्र रस्त्यावरील खड्डे जैसे थे.

महामार्गावरील प्रवासही आता नकोसा वाटू लागला आहे. त्यामुळे प्रवासी संतप्त असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे गणपती सणापूर्वी ठेकेदाराने बुजवून सर्वसामान्य नागरिकांना मत्र्यांच्या आश्वासनानंतर खड्डे बुजवून दिलासा मिळेल का याकडे लक्ष लागले आहे. सदरच्या महामार्गाचे रूंदीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे. पावसामुळे त्याची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. पांडापूर कोलाड ते तिसे, रातवड रस्ता एवढा खराब झाला आहे की याचा त्रास परिसरातील नागरिकांना तसेच दैनंदिन प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासीवर्ग तसेच विद्यार्थी वर्गाला सहन करावा लागत आहे. वयोमानापरत्वे ज्येष्ठ नागरिक हा थकलेल्या अवस्थेत असतो. यामुळे या रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांची पुरती दमछाक होत आहे.

नागोठणे व कोलाड या ठिकाणाहून धाटाव व विळा एमआयडीसी जवळ येत असल्यामुळे येथे जाणाऱ्या मालवाहू कंटेनर व अवजड वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. एकंदरीत अवजड वाहनाच्या वर्दळीमुळे पांडापूर, वाकण ,सुकेळी, खांब, पूगाव, पुई, महिसदरा पूल, कोलाडचा मुख्य चौक, तिसे या दरम्यान महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. याचा सर्वाधिक त्रास प्रवाशी वर्गाला होत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातवरण आहे.

या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हे खड्डे गणपतीपूर्वी भरून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास काही प्रमाणात तरी सुखकर करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

-डॉ. मंगेश सानप
कोलाड

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!