• दापोली समुद्रकिनाऱ्यानंतर आता श्रीवर्धन समुद्रकिनारी वाहत येताहेत चरसची पाकिटे
• श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे समुद्र किनारी 26 किलो 550 ग्रॅम चरस हस्तगत; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे समुद्र किनारी समुद्राच्या पाण्यातून वहात आलेली 26 किलो 550 ग्रॅम वजनाची एकूण 24 चरस या अंमली पदार्थाची पाकिटे भिजलेल्या अवस्थेतील पाकिटे दिघी सागरी पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास हस्तगत केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे, कर्दे, तसेच गुहागर तालुक्यामध्ये समुद्रकिनारी पाण्यातून वाहत आलेली देखील यापूर्वी अशाच स्वरूपाची अमली पदार्थाची पाकिटे मिळून आली होती. आता रायगड जिल्ह्यामध्ये देखील समुद्र किनारी अशी पाकिटे सापडू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर त्यानंतर आता दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्वे समुद्रकिनारी पाण्यामध्ये भिजलेल्या अवस्थेतील 26 किलो 550 ग्रॅम वजनाची एकूण 24 चरस या अंमली पदार्थाची भिजलेल्या अवस्थेतील पाकिटे सापडली आहेत. सापडलेल्या चरस पाकिटांची एकूण किंमत 1 कोटी 7 हजार आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर सर्च ऑपरेशन करीत असून त्यातून पोलिसांना ही पाकिटे मिळून आली.
दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी पोलीस हवालदार संदिप चव्हाण, संतोष नामदेव चव्हाण, पोलीस नाईक प्रकाश सुर्वे, सूर्यकांत जाधव यांच्या साथीने ही पाकिटे महसूल प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.