घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिकेच्या माध्यमातून कचरा उचलण्याचा कोट्यवधी रुपयांचा ठेका ठेकेदाराला देण्यात आला आहे. परंतु, ठेकेदार नियमांची पायमल्ली करून कचरा उचलीत आहे. यावर निर्बंध ठेवणारी उरण नगरपालिकेची आरोग्य विभागही सुस्त झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. एकीकडे राज्यात स्वच्छता अभियान राबविला जात असताना मात्र उरण नगरपालिका कार्यालयासमोरच कचऱ्याची दुर्गंधी पसरली होती.

उरण नगरपालिकेच्यावतीने घनकचऱ्याचा ठेका खासगी ठेकेदाराला दिला आहे. परंतु ठेकेदार दिलेल्या नियमानुसार कचरा गोळा न करता नियमांची पायमल्ली करीत असल्याच्या जनतेच्या तक्रारी आहेत. याबाबत आरोग्य विभागाचे निरीक्षक हरेश तेजी यांच्याकडे पत्रकार, सामाजिक संघटना व स्थानिक जनतेने अनेक वेळा तक्रारी करूनही ते कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नाहीत. उलट ठेकेदार व अधिकारी तेजी यांची गट्टी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कचऱ्याच्या गाड्यांची बिकट अवस्था असून त्यातील काही बंद आहेत. त्यामुळे टॅक्टरमध्ये घनकचरा घरोघरी न जाता रस्त्यावरीलच गोळा केला जातो. कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांच्या नंबर प्लेट गायब आहेत. त्यांची पासिंग, इन्शुरन्स, आरसी बुक, पियुसी केली नसल्याची धक्कादायक माहिती कचरा गोळा करणाऱ्या वाहनचालकांनीच दिली. काही कचरा भरलेल्या गाड्यांना धक्का मारावा लागत आहे, तर काही गाड्या नगरपालिका आवारात बंद अवस्थेत पडल्या आहेत. भंगारमध्ये टाकण्यात आलेल्या गाड्यांचा वापर ठेकेदार शहरातील कचरा उचलण्यासाठी करीत असल्याचे समजते. लवकरच याबाबत आरटीओ विभागाला तक्रार करण्यात येणार आहे. तसेच कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना साहित्य तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जी सोयीसुविधा देणे आवश्यक असताना दिली जात नाही. तसेच नियमानुसार वेतन देण्यामध्येही तफावत जाणवत आहे.

आज तर सकाळी पालिका कार्यालयासमोरच दुर्गंधीचे साम्राज्य पसरत गाड्यातील कचरा कार्यालयासमोरच अस्ताव्यस्त पसरला होता. कचऱ्याची बायोगॅससाठी विभागणी करण्यात येत असेल तर ते सर्व वेगळ्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तसेच कचऱ्याचे वजन होणे आवश्यक असताना ते होताना दिसत नाही. या सर्वाला बगल देत पालिका कार्यालयासमोरच हे सर्व सुरू होते. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत होती. याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे लक्ष नाही की आर्थिक साटेलोटामुळे चिडीचूप आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत होती. तसेच ठेकेदाराच्या माणसांकडे याची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन तुम्हांला काय करावयचे ते करा असे सांगतात. त्यामुळे या सर्व कचऱ्याच्या ठेक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गौडबंगाल असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नियमानुसार ठेकेदार कचरा गोळा करण्याचे काम करीत असतात तर आरोग्य निरीक्षक हरेश तेजी हे चिडीचूप न राहता त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली असती.