रावेपाठोपाठ तांबडशेतमध्येही यशस्वी बचाव मोहीम; जिल्हा प्रशासनाची तत्परता अन् ‘आपदा मित्रां’च्या धाडसाला सलाम
रायगड : पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलेला असताना प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या दोन नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांची जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि प्रशिक्षित ‘आपदा मित्रां’च्या धाडसी प्रयत्नांमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. पुराच्या पाण्याचा वेग, गावांना पडलेला पाण्याचा वेढा आणि मार्गाचा अंदाज घेण्यातील मोठी जोखीम अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी लागोपाठ दोन बचाव मोहिमा यशस्वी केल्या. दोन्ही गर्भवती महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढून वेळेत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून रावे, ता. पेण येथील पायल राजेश पाटील (वय २३) या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याची माहिती दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिर्के यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांना ही माहिती दिली. आणि तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना तातडीने बचाव पथक पाठविण्याच्या सूचना दिल्या. मात्र, रावे गावाला पुराच्या पाण्याचा पूर्णपणे वेढा पडला होता. गावापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे बोटीच्या माध्यमातूनच बचावकार्य करणे आवश्यक होते. पुराच्या पाण्याला मोठा वेग होता. तसेच पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे मासेमारीची बोट घटनास्थळापर्यंत नेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत बचाव मोहीम राबविणे अत्यंत जोखमीचे होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी तातडीने समन्वय साधून शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या रबर बोटीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पुराच्या पाण्याचा वेग आणि मार्गाचा अचूक अंदाज घेणे कठीण असतानाही आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण घेतलेले आपदा मित्र अभिकेत म्हात्रे यांनी धाडसाने पुढाकार घेतला. त्यांना आपदा मित्र राजेश म्हात्रे यांनी साथ दिली. दोन्ही आपदा मित्रांनी आपल्या प्रशिक्षणाचा आणि कौशल्याचा प्रभावी वापर करून रबर बोट पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे रावे गावातील गर्भवती महिला असलेल्या ठिकाणापर्यंत नेली. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक बचावकार्य राबवत पायल राजेश पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या अन्य चार जणांना रबर बोटीतून सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. बचाव पथक किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच प्रशासनाने रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती. त्यामुळे कोणताही वेळ न दवडता पायल राजेश पाटील यांना तातडीने पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहिली मोहीम पूर्ण होते न होते तोच दुसरा मदतीचा कॉल
रावे येथील अत्यंत जोखमीचे बचावकार्य पूर्ण होते न होते, तोच प्रशासनाला तांबडशेत गावातून आणखी एक तातडीचा मदतीचा संदेश प्राप्त झाला. तांबडशेत गावातही एक नऊ महिन्यांची गर्भवती महिला पुराच्या पाण्यात अडकली होती. तिलाही तातडीने सुरक्षितस्थळी आणून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते.
पहिल्या मोहिमेतील आव्हाने आणि जोखीम यांना सामोरे गेल्यानंतरही क्षणाचाही विलंब न करता आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे पुन्हा दुसऱ्या बचाव मोहिमेसाठी सज्ज झाले. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या समन्वयातून त्यांनी तांबडशेत गावाकडे धाव घेतली.
पुराच्या पाण्यातून मार्ग काढत या दोन्ही आपदा मित्रांनी दुसरी बचाव मोहीमही यशस्वीपणे पूर्ण केली. तांबडशेत येथील नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेलाही सुरक्षितपणे पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यात आले आणि तिला आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
एकामागोमाग एक अशा दोन अत्यंत जोखमीच्या बचाव मोहिमा यशस्वी करून आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी प्रसंगावधान, धाडस, प्रशिक्षण आणि सेवाभावाचा आदर्श घालून दिला. या दोन्ही नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांना वेळेत सुरक्षितस्थळी आणून वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आल्याने माता आणि त्यांच्या गर्भातील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बचावकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
जिल्हा प्रशासनाची तत्परता, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा प्रभावी समन्वय, रुग्णवाहिकेची सज्जता आणि आपदा मित्रांचे धाडस यामुळे दोन गर्भवती महिलांना वेळेत मदत मिळू शकली. जीवाची जोखीम पत्करून राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेबद्दल रावे आणि तांबडशेत परिसरातील नागरिकांनी शासन, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि धाडसी आपदा मित्रांचे आभार मानले आहेत.
