अनंत नारंगीकर
उरण : सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी रुपये खर्च करून ४ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र पावसाळ्यानंतर सिडकोच्या दुर्लक्षिपणामुळे ही नारळाची झाडे आगीमुळे व पाण्याविना करपू लागली आहेत. त्यामुळे सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या झाडाचे हाल होऊ लागले आहे.

उरण तालुक्यातील सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा (झाडे लावा झाडे जगवा) या माध्यमातून हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे–भेंडखळ–करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च करून नारळाची व विविध प्रकारची इतर झाडे सन २०२२-२३ मध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या ठेकेदारांच्या माध्यमातून लावली आहेत.

मात्र, पैशाच्या लालसेपोटी संबंधित ठेकेदाराने सिडको अभियंताच्या देखरेखीखाली लागवड करण्यात आलेल्या नारळाच्या झाडावर जेसीबी मशीन चालवून पावसाळ्यात वाढलेलं गवत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच कापलेल्या गवताला आग लागल्याचा आनंद घेतल्याचं चित्र पहावयास मिळाले आहे.सध्या तर आगीत आणि जेसीबीच्या माऱ्याने होरपळून गेलेली नारळाची झाडे तसेच विविध प्रकारची इतर झाडे पाण्या अभावी करपू लागली आहेत.तरी शासनाच्या माझी वसुंधरा या योजनेतील १ कोटींच्या टेंडरची सखोल चौकशी करून संबंधित सिडकोचे अभियंता यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
