• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नावरून गदारोळाची शक्यता?

ByEditor

Dec 10, 2023

जनआक्रोश समितीचे 12 डिसेंबरपासून पेण तालुक्यातील पांडापूर येथे बेमुदत साखळी उपोषण!

मिलिंद माने
मुंबई :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या रखडलेल्या कामाला पंधरा वर्षे पूर्ण झाली असून 31 डिसेंबर 2023 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन पूर्णपणे धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुरावस्थेबाबत जन आक्रोश समितीने रायगड जिल्ह्यातील कासू पांडापूर येथे 12 डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्याचे ठरविले आहे. तत्पूर्वी सोमवार, ११ डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न चर्चेला आल्याने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावरून कोकणातील आमदार गदारोळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणावर या महामार्गावरून प्रवास करताना दररोज वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. असे असताना मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या कामाबाबत वस्तुनिष्ठ अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितला असला तरी राष्ट्रीय महामार्ग खात्याचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुजोर अधिकारी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला देखील वस्तुनिष्ठ सादर करतील का? असा प्रश्न कोकणातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील बहादूर शेख नाक्यावरील निर्माण उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर त्याबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तज्ञांकडून याबाबतचे निष्कर्ष मागवलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर ओवेस अन्वर पेचकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला व नॅशनल हायवे प्राधिकरणाला निर्देश द्यावेत अशी मागणी या याचिकेत केली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यात यावेत, महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राची ओळख निश्चित करावी व चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे व प्रवाशांना दिलासा द्यावा अशा सूचना न्यायालयाने द्याव्यात अशी मागणी या याचिकेत केली आहे. सन 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले होते की सन 2010 मध्ये सुरू झालेल्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाची गती निराशा जनक होती त्यामुळे या कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते. सन 2024 च्या जुलैमध्ये उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला या खटल्याच्या खर्चापोटी पन्नास हजार रुपये खर्च द्यावा अशी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले. कारण याचिकाकर्त्यांनी महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत व त्यावरील कामाच्या हमीचे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी उल्लंघन केल्याने अनेकदा न्यायालयात जावे लागले होते.

पळस्पे ते इंदापूर पहिला टप्पा?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या पळस्पे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम कोकणचे भाग्यविधाता व रायगडचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर .अंतुले यांनी केंद्रीय मंत्री असताना प्रस्तावित केले होते. आज पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला तरी पहिला टप्पा अजूनही पूर्ण करता आलेला नाही. गणपती झाले, दसरा झाला, दिवाळी झाली आता शिमगा आला तरी या पहिल्या टप्प्याचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल रायगडकर जनता सरकारला विचारीत आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार, खासदार, आमदार हे अजून किती वर्ष महामार्ग पूर्ण होण्याचे स्वप्न कोकणकरांना दाखविणार? असा प्रश्न कोकणातील जनता विचारत आहे.

31 डिसेंबर 2023 पर्यंत कोणत्याही स्थितीत या महामार्गाचे काम पूर्ण करणारच असे आश्वासन राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री व कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. मात्र 2023 संपण्यास केवळ पंधरा दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने या 15 दिवसात कोकणातील महामार्ग कसा पूर्ण होणार असा प्रश्न कोकणातील जनतेला पडला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पळस्पे फाटा ते इंदापूर पर्यंतच्या पळस्पे ते कासू या 42 . किलोमीटरमधील कामाचा दर्जा पाहता व काँक्रिटीकरणाचे काम बघता अनेक ठिकाणी पडलेले खड्डे व काँक्रिटीकरणाच्या कामात एक सारखेपणा नसल्याने रस्त्यावरून प्रवास करताना जम्पिंग जपाक सारखा अनुभव कोकणकरांना दररोज येत आहे.

पेण तालुक्यातील कासू ते इंदापूर या टप्प्यातील कामाची वर्कऑर्डर 11 ऑक्टोबर 2022 रोजी ठेकेदाराला दिली. मात्र, एक वर्षात या महामार्गाचे काम किती झाले व त्याची गुणवत्ता कशी आहे? हा संशोधनाचा विषय आहे. कासूपासून पांडापूर, हवेली, आमटेम, नागोठणे वाकण व सुकेळी खिंड या परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत भयानक आहे. या महामार्गावरून प्रवास करताना रुग्णवाहिकेतील रुग्णांना, वृद्ध, अपंगांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.

इंदापूर माणगाव बायपासचे काम कधी होणार?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर व माणगाव या दोन्ही ठिकाणी दररोज होणारी व कोकणातील गणेशोत्सव, शिमगा तसेच सुट्टीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता व मोठ्या प्रमाणावर रहिवासी क्षेत्राचे नुकसान होऊ नये यासाठी या दोन ठिकाणी बायपास काढण्यात आलेला आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी बायपासचे काम 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारकडून लेखी आश्वासन दिले असताना आज डिसेंबर महिन्याचा कालावधी संपण्यास जेमतेम पंधरा दिवसाचा अवधी असताना या बायपासचे काम अद्याप रखडलेलेच आहे. त्याचप्रमाणे परशुराम घाट व कशेडी बोगदा या ठिकाणी देखील कामाची गती मंदावल्याचे दिसते. गणेशोत्सव काळात कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, गणेशोत्सव संपताच या बोगद्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने या बोगद्यातून जाणारी वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली.

कशेडी बोगद्याचे लोकार्पण 26 जानेवारी रोजी होणार?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगद्याचे काम हाती घेतले मात्र, अजूनही बोगद्याचे काम अर्धवट अवस्थेत असून तशाच परिस्थितीमध्ये 26 जानेवारी रोजी या बोगद्याचे दोन्ही बाजूकडील मार्गीकेचे लोकार्पण करण्याचा मानस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी घेतल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यावर ऐकण्यास मिळाले.

12 डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाबद्दल तसेच महामार्गावरील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत जनआक्रोश समिती पेण तालुक्यातील कासू पांडापूर येथे 12 डिसेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याने महामार्गाच्या दुरावस्थेबाबत कोकणातील नागरिक या साखळी उपोषणाच्या माध्यमातून आक्रमक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपोषणकर्त्यांनी राज्य सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नऊ मागण्या केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे :

(1) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करावे तसेच १२ डिसेंबर 2023 पर्यंत कासु ते नागोठणे येथील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी पेवर ब्लॉक टाकले आहेत ते काढून रस्ता सुस्थितीत करावा तसेच रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे त्याबाबत उपाययोजना करावी
(2) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 पनवेल ते इंदापूरच्या रस्त्या रुंदीकरणाच्या कामात पाटणे ते आनंदनगर येथील शेतकऱ्यांच्या सुपीक शेती लगत केलेल्या शेतातील पाणी व सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व भविष्यात नुकसान टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत कायमस्वरूपी पाणी वाहून नेणारा नाला त्या ठिकाणी बांधण्यात यावा.
(3) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला पळस्पे फाटा खारपाडा टोल नाका, पेण व इंदापूर येथे रस्त्यालगत बोर्ड लावून त्यावर कंत्राटदार कंपनीचे नाव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच कार्यालयाचा ईमेल आयडी व रस्त्याच्या हमीचा कालावधी हे सुस्पष्ट शब्दात लिहण्यात यावे.
(4) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पूर्णपणे धुळीचे साम्राज्य पसरले असून प्रवासी व नागरिकांना त्याचा सामना करताना दररोज आजाराचा देखील सामना करावा लागतो. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी तसेच ज्या रहिवासी क्षेत्रातील घरांना धुळीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे त्यांना मोबदला देण्यात यावा.
(5) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिनियम अन्वये धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देऊन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच आजपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना किमान 20 ते 25 लाखाच्या आर्थिक सहाय्य व शासकीय नोकरी देण्यात यावी.
(6) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या महामार्गावर अपघातामध्ये ज्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे त्यांच्या औषधोपचाराचा खर्च देऊन दहा लाख रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे व त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे.
(7) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काम पूर्ण होण्यास विलंब का झाला? यासाठी चौकशी समिती प्रस्थापित करून याबाबतचा चौकशी अहवाल मिळावा तसेच महामार्गाचे काम पळस्पे फाटा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झारापपर्यंत पूर्ण होईपर्यंत कोणताही टोल चालू करू नये.
(8) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताला शासन, प्रशासन, ठेकेदार व अडवणूक करणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असून त्यांची सखोल चौकशी करून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा व कामात दिरंगाई केल्याबाबतचे गुन्हे दाखल करून समस्त कोकणकरांना न्याय द्यावा.
(9) 12 डिसेंबर 2023 पर्यंत जनआक्रोश समितीच्या मागण्याची पूर्ततात न झाल्यास तसेच मागणीबाबत भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाचे अभियंते, रायगड जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त सहीचे स्टॅम्प पेपरवर पत्र न मिळाल्यास, कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यास बेमुदत उपोषण चालू ठेवण्यात येईल असे जनआक्रोश समितीने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

एकंदरीत मुंबई व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाच्या कामावरून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत गुहागरचे आमदार भास्कर जाधव व अन्य सहकाऱ्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उद्या होणारी चर्चा पुन्हा कोकणातील जनतेला या चर्चेदरम्यान महामार्ग पूर्ण करण्याचे नवीन कोणते आश्वासन व नवीन कोणती तारीख मिळते याकडे कोकणातील जनतेचे डोळे लागून राहिले आहेत तर या प्रश्नावर जर चर्चा झाली तर जनआक्रोश समितीचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागून कोकणातील जनतेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दररोजच्या होणाऱ्या त्रासापासून दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!