अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांचा विषय कायमच चर्चेत असतो, तो रायगड जिल्ह्यासाठी नवीन नाही. रायगड जिल्ह्यात अमली पदार्थ सापडल्याच्या बातम्याही आता लोकांना सवयीच्या झाल्या आहेत. पण हा एवढा गंभीर विषय कोणीच गांभीर्याने घेत नसल्यामुळेच रायगड जिल्ह्यात अमली पदार्थ माफियांचे फावते. रायगड त्यांच्यासाठी आश्रयस्थान झाले आहे. देश विदेशातील ड्रग्ज तस्कर रायगड जिल्ह्यासहित नवी मुंबईपर्यंत आपले केंद्र केले आहे.
रायगड जिल्ह्यात जवळपास 2200 च्या आसपास पोलीस अधिकारी कर्मचारी असून अमली पदार्थ विरोधी, किनारी सुरक्षा यापासून ते विविध प्रकारच्या तक्रारी नोंदविण्यासाठी वेगळी अशी सुमारे पंचवीस पोलीस स्टेशन आहेत. रायगड जिल्ह्यात पोलिसांचे गुप्तहेर आहेत. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असताना देखील खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ढेकू गावच्या हद्दीत सुमारे एकशे सात कोटी पेक्षा अधिक एमडी नामक अमली पदार्थ जप्त करीत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशातील ड्रग्ज व्यवहार संपविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. पण त्यासाठी फक्त एनसीबीला सक्रिय करून ध्येय साध्य होणार नाही. प्रत्येक राज्यातील पोलीस आणि त्यांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला सक्रिय करायला हवे. राज्य सरकारनेही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. अमली पदार्थ विरोधी पथकाला मजबूत करण्यासह स्थानिक गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्याची गरज आहे. रायगडच्या किनारी भागांत खरी समस्या आहे ती फोफावलेला वेश्याव्यवसाय, खुलेआम विकले जाणारे ड्रग्ज, डिझेल तस्करी यातूनच गुन्हेगारांना आश्रय घेण्याचे रायगड हे केंद्र बनले आहे. रायगड जिल्हा स्वच्छ करायचे असल्यास या गैर गोष्टींचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. सरकारचे आणि रायगड पोलिसांचे प्राधान्य हे जिल्ह्यातील ड्रग्जचे व्यवहार मोडून काढण्यासाठी असायला हवे.
रायगड जिल्ह्यातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा धोका वाढला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बंद असलेल्या कारखान्यावरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो . पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील जिल्ह्याला महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 12 हजार कारखाने आहेत. त्यामध्ये 19 मेगा कारखान्यांचा समावेश असून महाड, रोहा, तळोजा ,खोपोली,या परिसरात सुमारे दोनशेहून अधिक रासायनिक कारखाने आहेत. जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढत असताना, वेगवेगळ्या कारणांमुळे काही कारखाने बंद आहेत. या बंद कारखान्यांचा आधार घेऊन अंमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात सप्टेंबरपासून बंद कारखान्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. बंद कारखान्यांची तपासणी वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आली. तेथील संशयित हालाचालीवर लक्ष ठेवण्यात आले.
अमली पदार्थांच्या तस्करीमुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती निर्माण झाल्याने ही पावले उचलण्यात आली. रायगड जिल्ह्यातील बंद कारखान्यांचा आढावा घेण्याचे काम पोलिसांमार्फत सुरु आहे. या तपासणीत खोपोली येथील ढेकू गावातील बंद कारखान्याचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात आहे, हे उघड झाले. यामध्ये कल्याण येथील कमल जैसवानी, संभाजीनगरमधील मतीन बाबू शेख, ठाण्यातील ॲथोनी करुकुटीकरण या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुुनावण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पोयनाड, महाड तालुक्यात त्याचप्रमाणे मुंबई गोवा, मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अमली पदार्थांचे कारखाने, तसेच वाहतूक करीत असताना कारवाई करण्यात आली आहे. पोयनाड विभागात कारवाई ही नवी मुंबई पोलिसांनी केली होती.
अमली पदार्थांचे धागेदोरे गावोगावी, पान टपरीपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्याविरोधात मुकाबला करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. दर महिन्याला बैठका घेऊन ही तस्करी रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून बंद कारखान्यांची माहिती घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. पुढील पिढीला या संकटापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी देखील आजूबाजूला घडत असलेल्या संशयित हालचालीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे.
-सोमनाथ घार्गे
पोलीस अधीक्षक, रायगड