• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या प्रतीक्षेत पाच तास विविध पथकातील कलाकार उन्हात!

ByEditor

Jan 5, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध कला साहित्य पथकामधील कलाप्रेमी यांना भर उन्हात पाच तासाहून अधिक काळ उन्हात ताटकळत बसावे लागले.

राज्यातील नागरिकांना आपल्या महत्त्वाच्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागू नयेत, नागरिकांसाठी विविध कागदपत्रे सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीने विहित कालमर्यादेत मिळावीत. आणि त्यांचा यासाठी होणारा अनावश्यक खर्च वाचावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकारने नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे सुरु केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सुटण्यास मदत झाली आहे. एकाच ठिकाणी मग ते तालुक्याचे असो, जिल्ह्याचे असो किंवा अगदी गावखेडे असो…नागरिकांच्या दारी शासन आणि पर्यायाने जिल्हा तसेच तालुका प्रशासन येत आहे. स्वत:च्या गावात येऊन शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला, तसेच महिला बचत गट यांना आवश्यक कागदपत्रे, योजनांचा लाभ घरबसल्या मिळवून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न सुरु केले आहे.
रायगड जिल्ह्यात दिनांक 5 जानेवारी 2024रोजी रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेंद्र थोरवे आदी मान्यवरांसह इतर लोकप्रतिनधी, शासनाचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची वेळ ही दुपारी साडेबाराची होती. त्यामुळे मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध कलापथक यांना सकाळी साडे नऊ वाजल्यापासून मान्यवर येण्याऱ्या मार्गावर कलापथक, मल्लखांबमधील कलाप्रेमी यांना बसविण्यात आले होते. येणाऱ्या मान्यवर यांचे स्वागत वाजत गाजत तसेच रायगड जिल्ह्यातील कला दाखवून करायचे होते. मात्र, मान्यवर हे दुपारी दोनच्या आसपास आल्याने कलाप्रेमी यांच्यामध्ये संतप्त भावना निर्माण झाली होती.

येणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी आम्ही उरण येथुन सकाळी पाच वाजता निघालो आणि येथे नऊ वाजता पोहचल्यापासून मान्यवर येणाऱ्या रस्त्यावर बसून राहिलो मात्र चार तास होवून देखील मान्यवर आले नाही. त्यामुळे पडलेल्या कडक उन्हाचा त्रास आम्हा वारकरी भगिनी यांना सहन करावा लागला.

-भागुबई सावंत
उरण रायगड.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!