घन:श्याम कडू
उरण : एमएमआरडीने न्हावा-शिवडी पुलाची उभारणी करताना विकासकामे करण्याची दिलेली आश्वासने दिली ती पूर्ण झाली नाहीत. तसेच जमिनीचा मोबदलाही आजतागायत दिलेला नाही. या पुलाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी सरकार व एमएमआरडीए विरोधात आंदोलन करण्याचा इशारा चिरले ग्रामपंचायतने दिला आहे.
न्हावा शिवडी पुलाच्या उद्घाटनाची तारीख ठरली तरी बाधीत शेतकरी व मच्छीमार बांधवांना जमिनीचा मोबदला व मच्छीमारांना आर्थिक भरपाई मोबदला मिळालेला नाही. त्या विरोधात शेतकरी संदेश ठाकूर यांनी न्यायालयात याचिका दाखल करून जमिनीचा मोबदला मिळालेला नसल्याचे न्यायालयाने मान्य करून पुढील आदेश पारित केले असल्याचे समजते. परंतु, निकालाची प्रत मिळालेली नाही. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा चिरले ग्रामपंचायतने दिला आहे.
न्हावा शिवडी पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या दि. १२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. याच दिवशी चिरले गावातील पुलाच्या शेवटच्या टोकाला एमएमआरडीए व राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा चिरले ग्रामपंचायत सरपंच सुधाकर (काका) पाटील यांनी दिला आहे.