मिलिंद माने
महाड : तालुक्यातील बहुतांशी भागात मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने वातावरणामध्ये पूर्णतः बदल झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून सकाळी पहाटे कामावर जाणाऱ्या कामगारांना मात्र ऐनवेळी आलेल्या पावसाचा सामना करावा लागला.
महाड तालुक्यातील ग्रामीण तसेच औद्योगिक परिसरात काही ठिकाणी आज पहाटेपासून काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे ९ जून की ९ जानेवारी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला होता. या पावसामुळे वातावरणात काहींसा बदल झाला असून गारवा निर्माण झाला आहे. अचानक पाऊस आल्यामुळे वीटभट्टी उत्पादक तसेच बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यम ते हलक्या स्वरूपात कोसळत असल्या पावसाबद्दल अनेक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने या पावसाचा परिणाम आंब्याच्या मोहरावर होणार नाही, त्याचबरोबर वीटभट्टी कारखान्यांवर देखील होणार नसल्याचे मत जुन्या जाणत्या शेतकऱ्यांनी व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश शिंदे यांनी व्यक्त केले. या हलक्या स्वरूपाच्या पावसाचा परिणाम कडधान्याच्या रोपावर होऊ शकेल, या पावसामुळे कडधान्यावर बुरशी येण्याची शक्यता असून त्यामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता असल्याने आंबा उत्पादक, वीट कारखानदार यांच्यामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यात पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यामुळे शहरातील बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. दररोज ग्राहकांनी भरलेली बाजारपेठ आज पूर्णपणे शांत असल्याचे दिसत होते. महाड नजीक असलेल्या काही गावांतून त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान झाले नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.