• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्हा दौऱ्याने शिंदे गट व राष्ट्रवादीच्या तटकरेंवर आरोपांच्या फैरी बरसणार?

ByEditor

Jan 23, 2024

मिलिंद माने
महाड :
सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळे पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान रायगड जिल्ह्यातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग व पेण या मतदारसंघात मतदारांच्या भेटीसाठी ते प्रत्यक्ष येत असल्याने व त्यानिमित्त छोटेखानी जाहीर सभेच्या माध्यमातून होणाऱ्या सभांमुळे आगामी काळात रायगडातील वातावरण पुन्हा तापणार असून उद्धव ठाकरेंच्या रायगड जिल्ह्यामधील दौऱ्यामध्ये ते शिंदे गटातील आमदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यापैकी कोणावर निशाणा साधणार याकडे रायगडवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १ फेब्रुवारी रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातील पोलादपूर, माणगाव व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मोरबा येथे तर २ फेब्रुवारी रोजी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा व अलिबाग विधानसभा मतदार संघातील अलिबागमध्ये, पेण विधानसभा मतदारसंघातील पेणमध्ये प्रत्यक्ष मतदारांना व कार्यकर्त्यांना भेटणार असून शिवसेना पक्षाच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना स्वतः पक्षप्रमुख भेटण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीत पक्षातील कार्यकर्ते व मतदार हे पक्षप्रमुखांपुढे गद्दार आमदारांच्या कोणत्या गोष्टी सांगतात याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नेते व माजी मंत्री अनंत गीते यांचा पराभव झाल्यानंतर माजी खासदार अनंत गीते यांनी देखील रायगड लोकसभा मतदारसंघाकडे तब्बल तीन वर्ष दुर्लक्ष केले होते. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार सुनील तटकरे यांनी देखील राष्ट्रवादीत बंडखोरी करून अजित पवार गटात गेल्यानंतर खऱ्या अर्थाने रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा आपल्याला संधी मिळणार असे संकेत माजी खासदार अनंत गीते यांना आल्यानंतर त्यांनी पुन्हा रायगड लोकसभा मतदार संघातील जनतेशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

रायगड लोकसभा मतदार संघात येणाऱ्या महाड, श्रीवर्धन व दापोली या तीन मतदारसंघातील आमदारांनी शिवसेना पक्षात बंडखोरी करून शिंदे गटामध्ये सामील झाले असले तरी मूळ शिवसैनिक मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे मागील वर्षभराच्या काळात याचा प्रत्यय या तीनही आमदारांना आला आहे. मात्र, सत्तेच्या जोरावर व सत्तेतून मिळणाऱ्या विकासकामांच्या जोरावर ते मतदारांना भुलविण्याचे काम करीत असले तरी देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा सैनिक मात्र आज देखील निष्ठावंत असून तो अद्यापी मूळ शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दगा फटका तर बसणार नाही ना यासाठी त्यांनी खाजगी एजन्सी मार्फत मतदार संघात सर्वेक्षण देखील केले होते. मात्र त्या सर्वेक्षणात देखील त्यांना मूळ शिवसैनिकांनी नाकारल्याचे स्पष्टपणे आढळून आले. त्यामुळे शिंदे गटातील आमदार कमालीचे धास्तावले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुरुवातीच्या दीड वर्षाच्या काळात या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर दोन वर्षाचा कोरोनाचा काळ व त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेली त्यांची मुलगी आदिती तटकरे ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याची पालकमंत्री झाली, त्यावरती आता शिंदे गटात गेलेले महाडचे आमदार गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला दाखवलेल्या विरोधामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज होते. मात्र, सत्तेत असल्यामुळे त्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र, कालांतराने शिवसेना पक्षात फूट पडून रायगड जिल्ह्यामधल्या तिन्ही आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडच्या एकमेव आमदार आदिती तटकरे या पुन्हा महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्या तर त्यांचे पिता व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे रायगडातील सर्वच आमदार सत्ताधारी पक्षात समाविष्ट झाले. त्यामुळे रायगडात विरोधी पक्षाचा विधानसभेत एकही आमदार राहिलेला नाही. एकमेव विधान परिषदेचे जयंत पाटील हे शेकापक्षाचे आमदार विरोधी पक्ष म्हणून उरले आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांचे मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष व या मतदारसंघावर भाजपाने पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीवरून केलेल्या दाव्यामुळे यामुळे तटकरे हे कमालीचे धास्तावले आहेत. परिणामी या मतदारसंघातून त्यांना दिवसेंदिवस होत असलेला विरोध हा मोठा असल्याने ते लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याऐवजी भाजपाशी हात मिळवणी करून विधान परिषदेवर स्वतःची व कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांची वर्णी लावण्यासाठी त्यांची घोडदौड चालू झाली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे हे भाजपा बरोबर गेल्याने या मतदारसंघातील चार लाख मुस्लिम मतदार हा तटकरे यांना मतदान करणार नाही याची पुरेपूर खात्री त्यांना असल्याने त्यांनी देखील या मतदार संघातून पुन्हा लोकसभेची निवडणूक न लढण्याचे निश्चित केले असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपा बरोबर त्यांचा विधान परिषदेमधील आमदारकीचा सौदा चालू असल्याने त्यावरती एकदा शिक्कामोर्तब झाला की ते या निवडणुकीतून जाहीररीत्या माघार घेतील असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी खाजगीत सांगत आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघातून सर्वसामान्य जनतेला व शिवसैनिकांना परिचित असलेले माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांची उमेदवारी ही पुन्हा एकदा शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाऊ शकते. कारण या मतदारसंघात भाजपाकडून उभे राहणारे धैर्यशील पाटील यांची ओळख जरी रायगड जिल्हा दक्षिण भाजपा अध्यक्ष म्हणून व माजी आमदार म्हणून असली असली तरी ते देखील गीते यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे आहेत. मात्र या मतदारसंघातील महाड, श्रीवर्धन, दापोली व गुहागर या मतदार संघात मात्र ते नवखे असल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी विजयाचा मार्ग मात्र त्यांना शिंदे गटातील महाड, अलिबाग व दापोली या मतदारसंघातील आमदार व राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे किती मदत करतील यावरच सर्व काही अवलंबून आहे.

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गटात गेलेले आमदार व राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले खासदार तटकरे व त्यांची कन्या आदिती तटकरे व मुलगा अनिकेत तटकरे यांच्या पैकी कोणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजकीय आरोप करतात व मतदारांच्या भेटीदरम्यान शिवसैनिक व मतदार या बंडखोर गद्दारांबाबत कोणती गुपिते सांगतात याकडे रायगड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!