कांबळे तर्फे महाड ग्रामस्थांचा आरोप
मिलिंद माने
महाड : तालुक्यात जल जीवन मिशन योजनांची कामे वेगाने सुरू असून या कामांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे अनेक ग्रामस्थांच्या तक्रारीवरून समोर येत आहे. महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेसाठी आणलेले पाईप निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या नळ पाणी योजनेसाठी आणलेले ते पाईप सहज वाकडे होत असून त्याची जाडी देखील कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाड तालुक्यात कांबळे तर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत गावातील वाडी वस्त्यांवर सध्या पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम मंजूर होऊन अनेक दिवस झाले आहेत मात्र, स्थानिक नागरिकांच्या वेगवेगळ्या तक्रारीनंतर या योजनेतील अंदाजपत्रकामध्ये वारंवार बदल करण्यात आले आहेत. शिवाय सदर काम हे आपल्याच माणसाला मिळावे या हेतूतून स्थानिक पुढाऱ्यांनी वारंवार हस्तक्षेप केल्याने हे काम रखडले होते. सद्या हे काम पुणे येथील एका ठेकेदाराने घेतले आहे. या करता आधीच्या ठेकेदाराने आणलेले पाईप वापरले जात आहेत. हे पाईप यापूर्वीच ग्रामस्थांनी नाकारले असल्याचे ग्रामस्थ नूर मोहम्मद यांनी सांगितले. मात्र, तरीदेखील हेच पाईप वापरण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिंदे कोंड येथे पाईपलाईन टाकण्याकरता खोदकाम करून यापूर्वी आणलेले पाईप घेण्यात आले. यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करत टाकण्यात येणारे पाईप हे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आणून दिले. हे पाईप अधिक जाडीचे नसल्याने सहज वाकत आहेत. कांबळे तर्फे महाड हे गाव आधीच कातळावर वसलेले आहे. यामुळे पाईप किमान दीड ते दोन फुट जमिनीखालून गेले पाहिजेत. वारंवार लागणारे वणवे, गावातून जाणारी अवजड वाहने यामुळे भविष्यात हे पाईप फुटल्यास पाणीपुरवठा खंडित होवू शकतो. यामुळे चांगल्या प्रतीचे पाईप टाकण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. सद्या टाकण्यात येणारे पाईप बदलले गेले नाही तर काम करू दिले जाणार नाही असा इशाराही ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला आहे.