अनंत नारंगीकर
उरण : विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेकरीता रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, अलिबाग तालुक्यांतील शेतकर्यांच्या जमिनी अल्प किंमतीत संपादित करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्या विरोध बाधित शेतकऱ्यांनी २२ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सर्व पक्षीय नेते तसेच ३ हजारच्यावर शेतकरी सहभागी होणार आहेत.

विरार-आलिबाग कॉरिडॉर हा शासनाचा महत्वाचा दळणवळण बहुउद्देशीय प्रकल्प पनवेल, उरण, पेण या तीन तालुक्यातून जाणार आहे. त्यासाठी शासनानी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अल्प किंमतीत कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. तरी ही शासन शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित करण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी गावोगावी बैठकाचा सपाटा सुरू केला असून २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोर्चात सर्व पक्षीय कमिटीचे नेते आमदार जयंतभाई पाटील, आमदार महेश बालदी, शिवसेना नेते बबनदादा पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडीतशेठ पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जनरल सेक्रेटरी प्रशांत पाटील, ९५ गाव प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष ॲड. सुरेशदादा ठाकूर तसेच शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील, उरण सा. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार आदी सहभागी होणार आहेत.
या मार्चाला पनवेल ,पेण, अलिबाग येथील ही विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांच्या कमिट्यांनी आपला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.