वनविभागाने अधिक सतर्क होण्याची गरज
शशिकांत मोरे
धाटाव : दरवर्षी रोहा तालुक्यातील अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम सुरू होतो. याच वणव्याची मालिका आठवड्यापासून सुरू झाली असून अनेक जंगल वणव्याला बळी पडत असतानाच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनीच हनुमान टेकडी व उडदवणे परिसर जंगलाला भीषण वणवा लागल्याचे भयाण दृश्य पाहायला मिळाले.
उडदवणे येथील जंगलाला लागलेल्या वणव्याची तीव्रता भयानक होती. अख्खा जंगल जळून खाक झाले की काय? असेच अनेक मैलावरून जाणवत होते. जंगलातील वनसंपदा वर्षानुवर्षे हेरपळत आहे. आतापर्यंत जिल्हा, तालुक्यातील अनेक जंगल वणव्याच्या भक्षस्थानी पडले. जंगलातील भलीमोठी झाडे, पशु, पक्षी नष्ट झालीत. जंगलच संपत आल्याने अनेक परिसरात वाळवंट जाणवत आहे. पाण्याची पातळी नाहीसी होत आहे. विहिरी, बोअरवेल सुक्या पडल्या आहेत. हाच धोका विचारात घेता वणव्यावर ठोस उपाययोजना राबविण्यात आल्या पाहिजेत. मात्र, ठोस उपायांकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने रोजच्या वणव्याने उर्वरीत जंगल सुरक्षीत राहतील का? अशी भीती आता व्यक्त होत आहे. दररोजचे वणवे विचारात घेता वनविभागाने अधिक सतर्क होण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
दरम्यान, उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी वाढत्या वणव्या समस्येवर प्रशासन अधिक व्यापक काम करणार आहे, तशी टीम सज्ज आहे, वणवे तातडीने विझविणे, वणवा नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रीया निकत यांनी रायगड जनोदयला दिली. तर जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत, वणवे लागूच नयेत, लगेच विझवण्यासाठी व्यापक सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरजही यातून व्यक्त झाली आहे.
तालुक्यातील जंगलांना दरवर्षी वणवा लागत असल्याने वनसंपदा पूर्णत: धोक्यात आली आहे. शहर, आजूबाजूच्या जंगलांतील अनेक दुर्मिळ झाडे, पक्षी संकटात आले आहेत. डोंगरांना अक्षरशः टक्कल पडले. दुसरीकडे दगड, माती खाणीच्या हव्यासाने जंगल संपत आहे. याकडे वनविभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. झाडे तोडली जात आहेत पण, काही वनाधिकाऱ्यांची व्यवहार्य बाब जंगलांसाठी अधिकच भयानक ठरत आहे. हे वास्तव असताना आठवडाभर अनेक जंगलांना वणवे लागल्याच्या घटना सुरूच आहेत. त्यात शेतकऱ्यांसाठी रयतेचे राज्य उभे करत शेतकऱ्यांच्या गवतालाही हात न लावण्याचे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनीच हनुमान टेकडी आणि त्यापेक्षा अधिक भयानक वणवा उडदवणे जंगलाला लागल्याचे समोर आले. एकीकडे शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना जंगलांना वणवे लागण्याची घटना साऱ्यांनाच चटका लावून गेली.
वणव्याची दाहकता समोर आणताच उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी वणवा विझविण्यासाठी टीम तातडीने कार्यरत झाली अशी माहिती दिली. सह्याद्री वन्यजीवन रक्षणार्थ संस्थेच्या कार्यकर्त्यांनीही वणवा विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. हनुमान टेकडी जंगलातील वणवा तातडीने विझविण्यात आला. उडदवणे परिसरातील वणवाही विझविला जाईल असे वनरक्षक व्ही. आय. राजपूत यांनी सांगितले. मात्र भीषण वणव्यात जंगलांची प्रचंड हानी झाली, याची भरपाई कोण करेल, त्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. दरम्यान, दररोजच्या वाढत्या वणव्यावर वनविभाग आता तरी नेमक्या काय उपाययोजना करतो? हे समोर येणार आहे. वणवा समस्येवर अधिक प्रभावी लोकचळवळ उभी करावी लागेल असाच हा प्रकार आहे, हे ठळकपणे नमूद झाले आहे.