मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीत गुरुवारी सकाळी किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली. मात्र, वायू गळतीच्या . वृत्तामुळे नागरिक भयभीत झाले होते. यातून वाचण्याच्या प्रयत्न करणारा एक कामगार देखील किरकोळ स्वरूपात जखमी झाला आहे.
महाड एमआयडीसीमधील नावाजलेल्या लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्यात गुरुवारी सकाळी किरकोळ स्वरूपात वायू गळती झाली. या वायू गळतीने नुकसान झालेले नसले तरी एक कामगार मात्र धावताना पडून जखमी झाला आहे. कंपनी कामगारांनी ही वायू गळती अवघ्या काही मिनिटातच आटोक्यात आणली. यामुळे कंपनीमधील बाकीचे सर्वच कामगार आपापल्या ठिकाणी कामावर रुजू झाले.

महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये वायु गळतीच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे कंपन्यांजवळील नागरी वस्तीमधील नागरिक आज झालेल्या वायू गळतीच्या किरकोळ घटनेमुळे चांगलेच धास्तावलेले दिसत होते. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत वारंवार अशी वायू गळती का होते? असा प्रश्न या परिसरातील नागरिक व आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगार वर्ग औद्योगिक व्यवस्थापनाला व कामगार सुरक्षा मंडळाला विचारत आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचे आजच्या लक्ष्मी ऑर्गानिक केमिकलच्या वायु गळतीच्या ताज्या उदाहरणावरून स्पष्ट दिसत आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीच्या जवळील असलेल्या आसनपोई आणि बिरवाडी गावांमधील नागरिकांनी मात्र कंपनीबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून कंपनी बंद केली जावी अशा प्रकारची मागणी केली आहे.
घटनेचे वृत्त समजतात महाड तहसीलदार श्री. शितोळे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतील सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे सदरील कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी यावेळी प्रशासनासमोर केली.