• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यातील बड्या नेत्याने थकविली अडीच लाखाची घरपट्टी, पाणीपट्टी

ByEditor

Feb 25, 2024

ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

मंगेश पत्की
नागोठणे :
नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीची कराची रक्कम थकविली आहे. गावातील अनेक सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीचा हा कर भरीत असतांनाच हा कर थकविणाऱ्यांमध्ये अनेक बड्या धेंड्याचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यासाठी 10 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली असतानाही घरपट्टी व पाणीपट्टी कराची रक्कम न भरणाऱ्या खातेधारकांची नळ जोडणी तोडून पाणीपुरवठा बंद करण्याची मोहीम ग्रामपंचायतीने सुरू केली असतानाच नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील एका बड्या नेत्याकडे करापोटी अडीच लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समजते. ग्रामपंचायतीकडून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई होत असतानाच ह्या बड्या नेत्यावर अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.

नागोठण्यातील काही भागांतील थकबाकीदारांची नळ जोडणी तोडण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या धडक कारवाईचा धसका येथील सर्वसामान्य जनतेने घेतला असून आपली थकीत घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कारवाईचा फारसा परिणाम येथील धनदांडग्यांवर होताना दिसत नाही. नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या एका बड्या नेत्याकडे घरपट्टी आणि पाणीपट्टीची साधारण अडीच लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. इतकी मोठ्या प्रमाणात थकबाकी असून देखील या बड्या नेत्यावर कोणतीच कारवाई ग्रामपंचायतीकडून होताना दिसत नाही. दरम्यान, ग्रामपंचायत केवळ गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांनाच वसुलीसाठी त्रास देते का? असा सवाल येथील सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने थकबकिदारांची यादी जाहीर करावी अशी मागणी प्रामाणिकपणे घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांतून होत आहे.

10 फेब्रूवारी 2024 पर्यंत आपली घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे भरणा करावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते. अन्यथा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 129 अन्वये जप्तीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे आवाहनही ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते. मुदती नंतरही रक्कम न भरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली असून लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्या बड्या धेंडांवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!