रायगड लोकसभा निवडणूक लढणारच; तटकरेंचे स्पष्ट संकेत
मिलिंद माने
महाड : रायगड लोकसभा निवडणुक लढवण्यास आपण स्वत: इच्छुक असून यावेळी सर्वच विधानसभा मतदार संघातून आपल्याला भरघोस मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त करीत ‘ठेवीले अनंत तैसेची राहावे’ अशी कोटी करीत त्यांनी माजी खासदार अनंत गीते यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे किल्ले रायगडावरील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या गटाला मिळालेल्या तुतारी अनावरणाचा झालेला कार्यक्रम हा राजकीय स्वरूपाचा होता व तो संतापजनक होता अशी प्रतिक्रिया रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज महाड येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे महाड येथे आले असता त्यांनी शासकिय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की,
यावेळी न्यायलय, निवडणुक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार तसेच खरा राष्ट्रवादी काँग्रेस व पक्षाचे चिन्ह हे अजित पवारांच्या गटाला दिले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो असे खा. तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्वत्रच तीव्र पाणीटंचाई जाणवत असून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवून त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अपुर्ण व रखडलेल्या धरणांची कामे मार्गी लावून टंचाई कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. जलजीवन मिशनच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत संताप व्यक्त करीत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्ह्यातील जनजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्याच्या सुचना केल्या असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
रायगड लोकसभा लढवण्याची आपली इच्छा असून यावेळी सर्व विधानसभा मतदार संघातून आपण मताधिक्य मिळवू असे सांगत . महाआघाडीच्या उमेदवारांनी आपले मतदार संघातील काम दाखवावे आणि एक लाख जिंकावे असे तटकरेंनी जाहिर केले. येत्या चार दिवसात महायुतीच्या घटक पक्षातील प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठांची बैठक होऊन सामंजस्याने रायगडमधील उमेदवारीचा प्रश्न सोडवला जाईल. कोणत्याही परिस्थितीत महायुती लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
किल्ले रायगडावर शरदचंद्र पवार यांच्या गटाला मिळालेल्या तुतारी या चिन्हाचे अनावरण केले गेले ते अयोग्यच होते असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगत आपल्याला समजायला लागले तिथपासून आजवर किल्ले रायगडावर एखाद्या राजकिय पक्षाचा कार्यक्रम झाल्याचे ऐकीवात नसून या कार्यक्रमानंतर अनेक शिवभक्तांचे आपल्याला फोन आले व त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मात्र, त्यावेळी आपण प्रतिक्रिया दिली असती तर त्याचा वेगळाच अर्थ विरोधकांनी काढला असता असे तटकरेंनी सांगितले.