मावळमधून संजोग वाघेरे तर उरणमधून मनोहरशेठ भोईर यांच्या नावाची घोषणा
घन:श्याम कडू/विठ्ठल ममताबादे/अनंत नारंगीकर
उरण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उरणमध्ये जाहीर सभा झाली, त्यावेळी त्यांनी भाजपावर व गद्दारांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे, त्याला तर आडवा करायचा आहे, पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत, ते कुठेही गेलं की आपलं दुकान चालू करतात. त्यामुळे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत. मी भाजपाबाबत याआधीही म्हटलं आहे की, अब की बार भाजपाला तडीपार करायचं आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता, असे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे तर उरण विधानसभेसाठी मनोहरशेठ भोईर यांच्या नावाची घोषणा करून एकप्रकारे प्रचाराचा नारळच फोडला.

आगामी लोकसभा निवडणुकांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठकाही होताना दिसत आहे. इतकच नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप करताना निवडणुकीत जिंकवून देण्याचे आव्हान करताना दिसत आहेत.
उरणमध्ये जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात पहिली निवडणूक होते अशातला भाग नाही, पण यंदाच्या निवडणुकीत चुकून भाजपाचं सरकार आलं तर ही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल. आजपर्यंत छातीठोकपणे सांगितलं होतं की, पुन्हा येईन, आज दिल्लीतले लोकही तेच सांगत आहेत, मी पुन्हा येईन, पण पुन्हा येईन म्हणणारे स्वतःच्या घरात जातील. ते परत लोकसभा किंवा विधानसभेत येऊ शकत नाहीत. एवढाच जर पुन्हा येईनचा आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला करता? असा सवाल करत भाजपाला संकटात ज्या पक्षाने साथ दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघाला आहात. इतके नतद्रष्ट राजकारणी या देशात जन्माला आले असतील असं वाटत नाही. जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढी फोडाफोडी केली, तरीही कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत. त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिलं. बाळासाहेबानंतर इतकी वर्षे झाली पण त्यांनी शिवसेना सोडली नाही. याला म्हणतात निष्ठा. हे जे काही गद्दार आहेत, त्या गद्दारांचा जो नायक आहे तो दाढी खाजवत असतो. आपल्याला काही आठवायचं असेल तर आपण डोकं खाजवतो, पण हा दाढी खाजवतो. पैसे खूप आहेत म्हणून दाढी खाजवायलाही माणसं ठेवली असतील तर मला माहीत नाही. शिवसेनेने देता येईल ते सगळं यांना दिलं तरीही पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासोबत आहे म्हणून निवडून आला आहात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. पण आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल यांना आता, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

आज कुपा शंकर सिंग या नेत्यांचे नाव पहिल्या यादीत येत आहे. भाजपा हा भ्रष्ट नेत्यांचा पक्ष झाला आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या यादीतून नितीन गडकरी सारख्या नेत्यांचं नाव वगळण्यात आले आहे. देशातील यंत्रणा गुलाम पण जनता गुलाम नाही. हे निवडणूकीत जनता दाखविणार आहे.पण ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला तर देशात जनता उद्रेक करेल हे आमच्या घराण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मोदी, अमित शहांनी लक्षात ठेवावे आणि देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनात घेऊन जाणारे अंमली पदार्थ गुजरात पोर्टमधून येतात कसे याचा तपास करावा गुह खात्यानी करावा.तरी उरण ,मावळ लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामाला लागणे गरजेचे आहे असे शेवटी उध्दव ठाकरे यांनी सांगून आपल्या भाषणातून मावळचे खासदार श्रीरंग बारणे व उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्यावर खोचक टीका केली.
यावेळी मावळ लोकसभा व उरण विधानसभेसाठी शिवसेना प्रणित आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेने आता इतर घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मावळ व उरण मधील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांना बाबत मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उरणमध्ये पाच वर्षानंतर पुन्हा आल्याने ते उरणच्या समस्यांवर प्रामुख्याने हॉस्पिटल, मैदान, सेफ्टी झोन, बेरोजगार, वाहतूक कोंडी, नैना, कॉरिडॉर यावर काय बोलतात याकडे उरणकरांचे लक्ष लागले होते. परंतु यावर कोणतेच भाष्य न केल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत होता.
यावेळी माजी खासदार अनंत गीते, मावळ उमेदवार संजोग वाघेरे, उरण उमेदवार मनोहरशेठ भोईर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, भावना घाणेकर आदींनी भाजपावर हल्लाबोल करून विद्यमान खासदार व आमदार यांची पोलखोल केली.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार जयंत पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, सचिन आहेर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मिलिंद पांगावकर, मार्तंड नाखवा, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, संपर्क प्रमुख दीपक भोईर, जगजीवन भोईर, कमलाकर पाटील, गणेश घरत, गणेश म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतात त्यांनी माजी खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर तसेच विद्यमान आमदार महेश बालदी यांच्यावर जोरदार प्रहार केला.श्रीरंग बारणे यांनी उरण जेएनपीटी मध्ये पार्किंगचे काम घेतले. याच्या पलीकडे त्यांनी कोणतेही काम केले नाही. विद्यमान आमदार महेश बालदी हे लोकांना फसवून सत्तेवर आले आहेत. या गद्दारांना त्यांची जागा दाखवा असे परखड मत संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले.
आजची लढाई हि जनता जनार्दणाची आहे. जेंव्हा लढाई जनतेच्या हातात असते तेव्हा ती लढाई शंभर टक्के यशस्वी होते. मोदी आणि शहा सर्वांना संपवायला बसले आहेत. राज्यात आमदार सुरक्षित नाहीत. भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होते. या राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. युवकांना रोजगार नाही. हे अन्याय आम्ही मुळीच सहन करणार नाही. पुढील आमदार मनोहरशेठ भोईर, खासदार संजोग पाटील हेच असतील इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना नम्र विनंती सर्वांनी पेटून उठा. अत्याचार थांबवायचे असतील तर हा लढा लढावे लागेल हि लढाई निष्ठावंतांची आहे. गद्दारांना त्यांची जागा दाखवील्याशिवाय राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी व्यक्त केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी आपल्या मनोगतातून महेश बालदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. महेश बालदी यांनी उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत हरवून दाखवितो असे म्हटले होते मात्र घारापुरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी जरी महेश बालदी उभे राहिले तर त्यांचे डिपॉजिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. महेश बालदी हे साधे ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे गद्दारांना त्यांची जागा दाखविणार असे परखड मत उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांनी व्यक्त केले.
शिवसेना नेत्या ज्योती ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की जनतेशी कोणतेही संवाद न साधता बंद खोलीतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधतात. हे मन की बात खोटं आहे. शिवसेनाचा चिन्ह चोरले, पक्षातील नेते चोरले तरीही शिवसेना पक्ष संपला नाही. उद्धव साहेब हे प्रत्येकाच्या मनात आहेत.महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत अगोदर स्वस्तात ४५० रुपयात गॅस सिलेंडर होते ते सिलेंडर आज ११५० रुपयावर गेला आहे. एकीकडे योजना दाखवायच्या व दुसरीकडे त्या योजना हिसकावून घ्यायचा हि भाजपची भ्रष्ट निती आहे. डोळे उघडण्यासाठी हा जनसंवाद मेळावा आहे. भाजपा फक्त घोषणाचा पाऊस करते. देत मात्र काही नाही असे मत ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी श्रीरंग बारणे हे फक्त पार्किंगच्या कामाला उरण मध्ये येतात. बाकी ते कोणतेही काम करत नाहीत. विद्यमान आमदार महेश बालदी यांना सत्तेचा माज आला आहे. पैशाचा माज आला आहे हा माज सर्वांनी उतरवायला पाहिजे. आपण आगरी कोळी कराडी समाजाने आगरी कोळी कराडी समाजातील उमेदवारलाच निवडून द्यायला पाहिजे पण तसे न राहता मारवाडी आमदार म्हणून निवडून येतो. हि दुर्दैवाची बाब आहे. असे परखड मत प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
उपऱ्या आमदारांकडे आता मत राहिलेले नाही. महेश बालदीकडे आता मते राहिलेले नाहीत. मी माझा सर्व पगार अपंगाना देतो. कोरोना मध्ये महेश बालदी हे उंदरा सारखे बिळात लपून बसले होते. उद्धव साहेब ठाकरे व महेश बालदी यांच्यात निवडणूक झाल्यास महेश बालदी यांचा १ लाख मतांनी निश्चित पराभव होईल. आगरी कोळी कराडी समाजाने आता मारवाडी आमदार निवडुन न देता स्थानिक मराठी आमदार निवडून द्यावा असे आवाहन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले.
शिवसेना नेते अनंत गिते यांनीही मनोगत व्यक्त करताना पुढील आमदार मनोहरशेठ भोईर तर पुढील खासदार संजोग पाटील हेच असतील. बहुमताने हेच उमेदवार निवडून येथील असा आत्मविश्वास व्यक्त केला.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अतिष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.एकंदरीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जनसंवाद सभेला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यावेळी उत्तम प्रतिसाद पहायला मिळाला. पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात संख्या पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे स्वतः च्या मर्जीने, स्व खुशीने शिवसेना पक्षाच्या प्रेमापोटी येथे आल्याचे दिसले.भाड्याने आणलेले किंवा पैसे देऊन आणलेले एकही कार्यकर्ता येथे दिसला नाही.