विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या साईडपट्ट्यांच्या कामामुळे खासगी ट्रॅव्हल बसला वाकणनजीक अपघात झाला असुन सुदैवाने या बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असुन मोठा अनर्थ टळला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाडकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रव्हल बस क्रमांक एमएच ०३ डीव्ही ७८९१ ही बस वाकणजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात साईड पट्टीवर आली असता निकृष्ट दर्जाच्या साईडपट्टीमुळे या बसची चारही चाके या साईड पट्ट्यात घुसली. परंतु, ही बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या १५ ते २० फूट खोल दरीत पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपादरीकरणाचे काम गेली पंधरा वर्षापासुन सुरु आहे. लोकनेत्यांकडून फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे. परंतु, या महामार्गाचे काम काही पूर्ण होत नाही. ज्या साईडचे काम पूर्ण झाले आहे त्या रस्त्याच्या साईडपट्ट्या माती टाकून फक्त भरल्या गेल्या असून खाली दगड गोटे न टाकल्यामुळे या साईडपट्ट्या खचत आहेत. यावरून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे दर्जाचे आहे हे दिसून येत आहे. यावर कोणाचाही वचक नसल्याने अशा घटना घडत आहेत. उन्हाळ्यात साईडपट्ट्या खचत आहेत तर पावसाळ्यात याची परिस्थिती काय होईल? हे यावरून दिसून येत आहे. परंतु अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रवाशांचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवासी वर्गातुन केला जात आहे.