विठ्ठल ममताबादे
उरण : राज्य शासनाने ४ मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करत उरण, पेण, पनवेल तालुक्यातील १२४ गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नेमणूक केलीय. एमएमआरडीएच्या विकास प्राधिकरणाच्या विरोधात ज्यांच्या हरकती सूचना असतील त्यांनी ३० दिवसांत देण्याचे नमूद केले होते.
याबाबत एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समिती (नियोजीत) यांच्या माध्यमातून उरण तालुक्यात संबधीत गावात गावबैठका, विभागीय बैठकांचे आयोजन करत शेतकऱ्यांत जनजागृती केली गेली आहे. त्यामुळे बुधवार, दि. २७ मार्च २०२४ रोजी सहसंचालक नगररचना, कोकण विभाग नवी मुंबई येथे उरण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने हरकती दाखल करणार आहेत. याशिवाय काही ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेद्वारे घेतलेले विरोधाचे ठराव दाखल करण्यात येणार आहेत.
दि. २६ मार्च रोजी दिवसभर उरण तालुक्यातील संबंधित गावात एका वाहनाद्वारे जनतेला हरकती दाखल करण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे. २७ मार्च रोजी मोठ्या संख्येने शेतकरी हरकती दाखल करण्यात येणार असल्याचे तसेच हरकतीची मुदत वाढवण्यात यावी यासाठी समितीने पत्राद्वारे संबंधित विभागाला कळवले आहे. मात्र, संबंधीत विभागाकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत अर्बन हार्ट, बेलापूर येथे जमून एकत्रितपणे कोकण भवन येथे जाण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती रुपेश पाटील समन्वयक एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समिती (नियोजित) यांनी दिली आहे.