• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणी, सिडकोचे दुर्लक्ष

ByEditor

Apr 2, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. द्रोणागिरी नोडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित व कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. सिडको प्रशासनाने पाणी पुरवठा समस्येवर योग्य ते नियोजन केले नाही तर चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांनी उरण तहसील कार्यालयावर काढलेल्या हंडा मोर्चाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

विकसित नवी मुंबई शहराचे शिल्पकार म्हणून जनता सिडकोकडे पाहत आहे. अशा सिडको व्यवस्थापनाने खाजगी विकासकांच्या (बिल्डर) माध्यमातून उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड परिसरात रहिवाशी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक नागरिक द्रोणागिरी नोडमध्ये स्थिरावले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचा समावेश आहे. शहरी जीवन सुकर असते म्हणून द्रोनागिरी नोडमध्ये नागरिकांनी घरे घेतली. मात्र, नागरी सुविधांचा अभाव त्यात पाणी अनियमित व कमी दाबाने येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा नागरिक आपसात पैसे काढून टँकर मागवीत आहेत व टँकरच्या माध्यमातून उंच इमारतीत पाणी घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे या द्रोणागिरी नोडमधील नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे.

मात्र, याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. द्रोणागिरी नोडमधील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक अर्ज विनंती केल्या आहेत. मात्र, याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधी देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे द्रोणागिरी नोडमधील नागरिक हैराण झाले आहेत. एकंदरीत नागरी सुविधांचा अभाव त्यात पाणी टंचाईच संकट अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त झालेल्या रहिवाशांनी सध्या द्रोणागिरी नोड येथे न राहणे पसंत केले आहे. तसेच काही रहिवाशी हे चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांनी पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी उरण तहसील कार्यालयावर काढलेल्या हंडा मोर्चाची पुनरावृत्ती संबंधित प्रशासनावर करण्याचा निर्णय घेत आहेत.

मी गेल्या एक वर्षापासून द्रोणागिरी नोडमध्ये राहत आहे. मात्र, येथील पाणी समस्या पाहता पुन्हा एकदा गावी जाण्याचाच विचार करतोय. कारण कित्येकदा पत्रे, विनंती अर्ज करून देखील येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही.

-सुनिल ठाकूर
रहिवाशी द्रोणागिरी नोड

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!