घन:श्याम कडू
उरण : शनिवार रोजी रात्री ११ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी यांचा मृत्यू झाला तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कार चालक पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. कार चालक पळून गेला का त्याला वाचविण्यासाठी राजकीय दबावाने पळवून लावण्यात यशस्वी झाले? अशा चर्चेला उरणच्या नाक्यानाक्यावर उधाण आले आहे. तरी या घटनेतील आरोपीला शासन झाले तरच इतरांना त्याची वचक बसेल अशी जनतेत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यावेळी रिक्षा उभ्या असत्या तर आणखीन भीषण घटना घडली असती.
उरण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या प्रवेशद्वाराला लागुनच असलेल्या रस्त्यावर कार क्रमांक एमएच ४६ बीव्ही ५००० च्या चालकाने भरधाव वेगाने स्कुटर क्रमांक एमएच ४३ एए ४५९ जोरदारपणे धडक दिल्याने स्कुटरचा चक्काचूर होऊन पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघात झाल्यानंतरही वाहन चालक जय चंद्रहास घरत रा. म्हातवली, उरण याने उद्धटपणे रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ करून घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. भीषण धडकेत स्कुटीवर असलेले पवित्र बराल (४०), पत्नी रश्मीता बराल (३४) आणि पाच वर्षीय मुलगी परी असे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी पती पवित्र बराल यांचे येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तर पत्नी रश्मीता बराल यांचा वाशी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या पाच वर्षीय परीला ठिकाणी ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कारचा चालक जय चंद्रहास घरत रा. म्हातवली याने आपल्या हातून अपघात घडल्या नंतरही रस्त्यावर निपचित पडलेल्या तीघांना हटविण्यासाठी रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. यानंतर घटनास्थळावरुन पोबारा केला. याप्रकरणी रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल राजेंद्र चौहान यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आरोपी कार चालक हा नशेत असल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांच्या मृत्यूस चालकच जबाबदार आहे. घटनास्थळावरून आरोपी चालक फरार झाल्याने त्याला वाचविण्यासाठी राजकीय दबावाचा वापर केला जाण्याची शक्यता घटनास्थळी उपस्थित असलेल्या जनसमुदायात वर्तविण्यात येत होती. तरी बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या आरोपीस कडक शासन होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशीही मागणी जोर धरू लागली आहे.