विशेष प्रतिनिधी
उरण : शहरातील रेल्वे स्थानकासमोर शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली. चारचाकी गाडीचा चालक चरस, गांजा सारख्या नशिली पदार्थाचे सेवन करून नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेनंतर कार चालकाने रेल्वे पोलिसांशी अरेरावीकरून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर काही व्हिडीओ व्हायरल झाले त्यामध्ये घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस दाखल असतानाही आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? अशी चर्चा सुरू आहे.
अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या दुर्दैवी घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये वाहतुक पोलीस व पोलीस वर्दीमध्ये उपस्थित असल्याचे दिसते. त्यावेळी आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा सुद्धा तिथे असल्याचे व्हिडीओमध्ये सरळसरळ दिसत आहे. मग आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाच कसा? असा संशय निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील हे आमदार महेश बालदी यांच्या मर्जीतील असल्याने आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे बोलले जाते. पोलिसांनी आरोपी नशिली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड होऊ नये म्हणून पळून जाण्यास मदत केली असल्याचे समजते. या अपघातात दोन जीवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरुनही चालक पोलिसांसमोरून पळून गेल्याने पोलिसांची प्रतिमा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात मलिन झाली असल्याची जनतेत चर्चा सुरू आहे.
आरोपी जर जखमी असेल तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असताना परस्पर त्याचे मित्र किंवा इतर जण कसे काय घेऊन जाऊ शकतात. तरी व्हिडीओमध्ये जे त्याच्याबरोबर दिसतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे यापुढे इतरांना वचक बसेल अशी चर्चा सुरू आहे. नशीली पदार्थांचा अंश पोटामध्ये काही तास असतो. तो उघड होऊ नये म्हणून तर त्याला पळविण्यात आले नाही ना? तो नॉर्मल झाल्यानंतर आरोपीस अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.
अपघातानंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. परंतु, शनिवार दि. ६ एप्रिल रोजी अपघात घडल्यानंतर आज बुधवार, दि. १० एप्रिल येऊनही आरोपी फरार आहे. मग हे नक्की अपयश कुणाचे समजायचे असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.