• बांधपाडा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य
• रहिवाशांना तापानी ग्रासले; तालुका आरोग्य विभागाची उडाली धावपळ
अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. परंतू, ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे रहिवाशांना अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यात सध्या घाणीच्या साम्राज्याबरोबर, वाढत्या डासांमुळे गाव परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळले असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने उरण तालुका आरोग्य विभागाची एकच धावपळ सुरू झाल्याचे चित्र बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत पाहावयास मिळत आहे.
जेएनपीए बंदरामुळे उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतीने सदर गोदामाला ना हरकत दाखला देताना त्या गोदामातील घाणीची, सांडपाण्याची विल्हेवाट कुठे लावण्यात येणार याचा लेखाजोखा घेतला नाही. त्याचा त्रास नाहक गावातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात सध्या तुंबलेली गटारे, भेडसावणारी पाण्याची समस्या या सारख्या अनेक समस्यांनी रहिवाशांना ग्रासले आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसात गाव परिसरात डासांची उत्पत्ती होत असून डेंग्यू, मलेरिया सारखे रुग्ण आढळले आहेत.

खोपटा गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी गावातील समस्यांसंदर्भात शासनस्तरावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल उरण तालुका आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेऊन शनिवारी (दि. १३) गाव परिसराची पाहणी करून रुग्णांची तपासणी केली. यावेळी ॲड. सत्यवान भगत, अंगणवाडी सेविका, बांधपाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच रितेश ठाकूर, सुजित म्हात्रे, देवानंदन पाटील, राजश्री पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीत सांडपाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे डासांची पैदास होते. तरी रहिवाशांनी घाबरून न जाता आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आज जे रुग्ण आढळले आहेत त्यांची तपासणी करण्यात आली आहे. रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम स्थानिक ग्रामपंचायतीचे आहे. त्यांनी योग्य खबरदारी घेतली तर गावात यापुढे अशा प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. तरी रहिवाशांनी घाबरून न जाता आजाराची लक्षणे दिसताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी
डॉ. राजेंद्र इटकरे
वैद्यकीय अधिकारी, उरण तालुका