• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोथूर्डे धरणाची पाणीपातळी घटल्याने महाडमध्ये एक दिवस आड पाणीपुरवठा

ByEditor

Apr 12, 2024

२२ गाव आणि महाड शहराला जाणवणार पाणीटंचाई

नगरपालिकेला करावी लागणार तारेवरची कसरत

मिलिंद माने
महाड :
शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तसेच परिसरातील २२ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कोतुर्डे धरणातील पाणीसाठा चालू वर्षी कमी पर्जन्यमापन झाल्याने धरणात केवळ दहा ते बारा टक्के पाणीसाठा असल्याने महाड शहर आणि २२ गावांना पाणीटंचाई एप्रिल महिन्यापासूनच जाणवणार आहे.

महाड शहरासह तालुक्यातील २२ गावं कोथुर्डे धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. यंदा धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच या धरणाच्या पाण्याची पातळी घटली होती. या धरणात फक्त दहा ते बारा टक्के पाणीसाठा सध्याच्या घडीला असल्याने महाड शहर आणि परिसरातील २२ गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरासाठी इतर काही पाण्याचे पर्याय असले तरी मात्र २२ गावं हे या धरणातील पाण्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे या गावांना एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

महाड शहराला प्रामुख्याने कोथुर्डे धरणातून पाणी पुरवठा होतो. याशिवाय कुर्ले धरण व एमआयडीसी येथूनही काही प्रमाणात शहरातील पुर्वेकडील व उत्तरेकडील भागात पाणी पुरवठा होतो. या चारही ठिकाणाहून दररोज ४० लाख लिटर पाणी नगरपालिका शहराला पुरविते. कोथुर्डे धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मोठ्या टाकीत आणण्यात येते. तेथून बहुतांश भागाला पाणीपुरवठा केला जातो. कोथुर्डे धरणातील पाण्यावर महाड शहराप्रमाणे या परिसरातील केंबुर्ली, दासगाव, वहूर, मोहोप्रे, गांधारपाले, लाडवली, नाते, खर्डी, चापगाव, तळोशी, नांदगाव खु., नांदगाव बु., करंजखोल, तेटघर, कोकरे, आचलोळी आदी गावांना देखील पाणीपुरवठा केला जातो. यंदा या धरणाच्या पाण्याची पातळी खालावल्यामुळे या २२ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवणार असल्याने त्यांना देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रशासनाला करावा लागणार आहे. यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात झाल्याने धरणामधील पाणी कमी झाले आहे.

महाड शहरातील पाणीपुरवठा करताना नगरपालिकेला कोथुर्डे धरणातून मागील वर्षी पंप लावून पाणीउपसा करावा लागत होता. मागील वर्षी ५ मे पासून धरणातील कमी पाणी साठ्याला पंप लावून उपसा करून यातील पाणी नगरपालिका शहरात पुरवत होती. मात्र, यावर्षी धरणातील पाणीसाठा दहा ते बारा टक्क्यावर आल्याने पाऊस सुरु होईपर्यंत सद्य परिस्थिती एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे महानगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी याबाबतचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात कोणकोणत्या वेळेला पाणीपुरवठा केला जाईल यासाठी वेळापत्रक तयार केले आहे.

महाड शहराला एक दिवसाआड पाणी मिळणार असल्याने महाडकारांनी पिण्याचे पाणी जपून वापरण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकांना वापरालाही मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने काही नागरिकांना शहरातील विंधनविहिरीचा वापर करावा लागणार आहे. तर मोठ्या इमारतीमध्ये पाण्याचा टँकर विकत मागवावा लागणार आहे.

महाड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. रहिवासी इमारती व व्यापारी पाणी वापर वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याची गरज भागत नसल्याने नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पूरामुळे तर उन्हाळ्यात टंचाईमुळे महाडकरांना पाणीपाणी करावे लागत आहे. महाड शहरात कोथूर्डे, एमआयडीसी, रानबाजीरे, कुर्ला या धरणातून पाणीपुरवठा होतो. कुर्ला धरणातून दादली येथे आणलेले पाणी प्रक्रिया करून शहरात आणले जाते. अशाच पद्धतीने कोथूर्डे धरणातून देखील आणलेले पाणी प्रक्रिया करून पुरवठा केला जातो. शहरात जवळपास २५००० नळ जोडणी आहेत. कोथूर्डे वगळता कुर्ला धरणात अद्याप पाणी साठा बऱ्यापैकी असून शहरात पाणी पुरवठा करताना सर्वांना पाणी पुरेल अशा पद्धतीने नियोजन केल्याचे पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर यांनी सांगितले. नागरिकांनी देखील पाण्याचा योग्य आणि गरजेपुरता वापर करावा असे आवाहन पालिकेमार्फत केले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!