भुवन येथे आई भवानी माता मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा
विश्वास निकम
कोलाड : भावापेक्षा श्रद्धा मोठी आणि श्रद्धेपेक्षा विश्र्वास हा अति महत्वाचा आहे. देहाला श्र्वासाची गरज आहे तेवढीच त्या देवाला विश्वासाची गरज आहे. श्वास संपला की जीवन संपते त्याच प्रमाणे विश्र्वास संपला की देवही मिळणे शक्य होत नाही. मग विश्र्वास कोणावर ठेवावा? हा प्रश्न निर्माण होतो. धनावर, पैशावर ठेवावा का? पैसा आज आहे तर उद्या नाही, मग विश्वास कोणावर ठेवावा तर ते संतांचिया पायी हा माझा विश्र्वास l सर्वभावे दास झालो त्यांचा…त्यामुळे संतांचे पाय धरल्याशिवाय भगवंतांची प्राप्ती होत नसल्याचे मौलिक मार्गदर्शन हभप सोनालीताई अडखले यांनी आपल्या कीर्तन सेवतून प्रकट केले.
मौजे भुवन येथे आई भवानी माता मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन ग्रामस्थ, महीला मंडळ तसेच आदर्श मित्र मंडळ व मुंबईकर मंडळ भुवन यांच्यावतीने मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. यावेळी आयोजित कीर्तन सेवेत हभप सोनालीताई अडखले, पिटसई कोंड (तळा) यांनी मौलिक मार्गदर्शन करत भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विणेकरी हभप अनिल महाराज सानप, मृदुंगमणी सुरज महाराज अडखले, किर्तनकार तथा गायनाचार्य प्रियंका मंचेकर, अक्षय ओव्हाळ, किर्तनकार वासुदेव अडखले, महादेव महाराज महाडीक यांच्यासह टाळकरी तसेच ग्रामस्थ, महीला, युवक मंडळ तसेच परिसरातील भाविक बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
संपुर्ण भारत देशात आई भवानी मातेला कुलदैवतेचा मान आहे. तर भुवन ग्रामस्थांसाठी ग्रामदेवतेचा मान आहे. कृत युगात अनुभुतीसाठी, त्रेता युगात श्री रामचंद्रासाठी, द्वापार युगात धर्म राजासाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली ही भवानी माता असे विशेष स्थान या भवानी मातेचे आहे. त्यामुळे या गावात या मातेचा उत्सव सोहळा साजरा होत असल्याने आनंद व्यक्त केला.
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥ तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाही ऐकीला ऐसा कोणी ॥३॥ या श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीन चरणाच्या अभंगातून येथील उपस्थित भाविक भक्तांना मंत्र मुग्ध करत सांगितले की, हरीच्या ठिकाणी दृढभाव ठेवणे हाच आपला स्वधर्म आहे, हे भक्तांनी नेहमी स्मरणात ठेवावे आणि त्यात खंड पडू देऊ नये. सर्व कामनांचा त्याग करून आनंदकंद परमात्मा पांडुरंगावर अढळ विश्वास ठेवावा. दुसऱ्या कोणाची वाट पाहू नये. अशा कोणत्याही अनन्य भक्ताचा देवाने त्याग केला असे ऐकलेले नाही असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात. आम्ही निष्ठावंत म्हणजे असंतुष्ट नाहीत उलट आमची तळमळ आनंदकंद परब्रह्म भगवंतासाठी आहे. पण निष्ठावंत भाव हा भक्ती करणाऱ्यांचा स्वधर्म अर्थात स्थायी भाव असायला हवा असेच संत तुकाराम महाराज सांगतात आणि ते निष्ठावंतालाही पटल्याशिवाय राहणार नाही असे शेवटी सोनालीताई यांनी सांगितले.
भुवन येथे आई भवानी मातेचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. भुवन ग्रामस्थ, महीला मंडळ, आदर्श मित्र मंडळ व मुंबईकर यांच्यावतीने येथील आई भवानी माता मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांच्यावतीने मंदिर परिसर रोषणाई करण्यात आली होती तसेच गावात रांगोळ्या, फुलांनी सजावट करण्यात आली होती. धार्मिक आणि आध्यात्मिक तसेच विविध कार्यक्रम याप्रसंगी आयोजित करण्यात आले होते. यावेळी पहाटे भवानी मातेचे अभिषेक पूजन, महाआरती, सायंकाळी संपुर्ण हरिपाठाचे नेतृत्व हभप अनिल महाराज सानप वरसगाव यांचे होते तर कीर्तनरूपी सेवा कीर्तन सम्राट महीला कीर्तनकार हभप सोनालीताई अडखले, पिटसई कोंड तळा यांची तसेच हरी भजन जागर असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.