मिलिंद माने
महाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत असून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा आधीच 43 ते 45 डिग्रीपर्यंत पोहोचला असल्याने ७ मे रोजी मतदान करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आपापल्या पक्षाचे मतदान काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र 1989 च्या लोकसभा निवडणुकीत ६६.२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी यापेक्षा कमी असल्याने यंदाच्या निवडणुकीत 1989 ची पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे.
सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यात 32 रायगड, 35 बारामती, 40 उस्मानाबाद, 41 लातूर, 42 सोलापूर, 43 माढा, 44 सांगली, 45 सातारा, 46 रत्नागिरी- सिंधुदुर्ग ,47, कोल्हापूर, 48 हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक 7 मे रोजी होत आहे. राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होत असताना या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाढत्या तापमानाने आधीच हाहाकार माजविला आहे. त्यातच पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने मतदार वाढत्या उष्णतेत पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे. राज्यात उष्णतेचा पारा 43 ते 45 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर सर्वत्र जाणवत आहे. त्यामुळे सकाळी नऊच्या आधीच सर्वसामान्य नागरिक आपली कामे उरकून घरातच बसतात. त्यातच ७ मे रोजी मतदान असल्याने व एप्रिल महिन्यापेक्षा मे महिना हा उष्णतेचा तीव्रता अधिक असणारा महिना असल्याने या काळात उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवते. यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे. मतदाराची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वच पक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांबरोबरच शीतपेय व आईस्क्रीम यासोबत वातानुकूलित गाडीतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच पक्ष या दृष्टीने तयारीला लागले आहेत.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात सन 1977 मध्ये 61.68%, तर 1980 मध्ये 63.5%, 1984 मध्ये 64.43%, सन 1989 मध्ये 66.2%, 1991 मध्ये 51.93%, सन 1996 मध्ये 57.68%, सन 1998 मध्ये 57.79%., सन 2004 मध्ये 61.32%, सन २००९ मध्ये 56.27%, सन 2014 मध्ये 64.47%, तर 2019 च्या निवडणुकीत 61.81% एवढी मतदानाची टक्केवारी झाली होती. मात्र, आतापर्यंतच्या मतदान टक्केवारीच्या आढाव्यानुसार सन 1989 मध्ये झालेली मतदानाची 66.2% एवढी टक्केवारी पाहता या टक्केवारीचा अद्यापपर्यंत विक्रम मोडलेला नसल्याने सन 1989 ची पुनरावृत्ती 2004 मध्ये होणार का? असा सवाल सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. त्यातच उष्णतेची तीव्रता लक्षात घेता साधारणपणे 62% च्या वर मतदान जाणार नाही असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.