• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

स्थलांतरीत झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र आनंदनगर शाखेत सुविधांची वानवा

ByEditor

Apr 15, 2024

गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये संताप; ग्राहकांना तत्पर सुविधा देण्याची मागणी

विठ्ठल ममताबादे
उरण :
तालुक्यातील प्रसिद्ध नामवंत वकील ॲड. दत्तात्रेय नवाळे हे गेल्या ३२ वर्षापासुन महाराष्ट्र बँकेचे ग्राहक आहेत. मात्र, आनंदनगर येथील बँकेत नागरिकांना, ज्येष्ठ महिला, आबाल वृद्ध, विद्यार्थी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि बाब ॲड. नवाळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगरमध्ये मिळणाऱ्या अपुऱ्या सेवा सुविधांबाबत आवाज उठविला असून बँकेत नागरिकांना चांगल्या व त्वरित सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा उरणचा कारभार यापुर्वी उरणमधील दशाश्री माळी कॉप्लेक्स, मोरा रोड उरण येथुन सुरु होता. गेल्या सहा महीन्यापासुन सदरची शाखा आनंद नगर उरण शहर येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे. यापुर्वी १५ ते २० वर्षापुर्वी सदरच्या शाखेमधे १५ ते २० कर्मचारी कार्यरत होते. परंतु आता तेथे फक्त ५ कर्मचारी काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आनंद नगर उरण येथे चाललेला बँकेचा कारभार अंदाधुंद अवस्थेत आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याचा परिणाम बँकेच्या खातेदारावर होत असून अनेक ग्राहक बँकेतील खाते बंद करत आहेत. त्यामुळे ॲड. नवाळे यांनी या अन्यायाला वाचा फोडली आहे. पुर्वीची शाखा जवळ जवळ ४० x १५ फुट एवढया जागेमधे चालु होती. ती आत्ता २० x १५ फुट एवढयाच जागेमधे चालु आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी शाखेमधे उभे राहण्यास सुद्धा जागा नसते. पुर्वीच्या शाखेमध्ये रक्कम देणे व घेण्याकरीता एकुण ३ कांऊटर उपलब्ध होते. त्याऐवजी या सर्व कामासाठी १ कांऊटर उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच रांगेमध्ये अर्धा ते पाऊण तास रखडत उभे रहावे लागते. त्यांना तेथे बसण्याची सुद्धा सोय उपलब्ध केलेली नाही.

बँकेने लावलेल्या एटीएम मशीनमध्ये २ ते ३ दिवस कधीकधी रक्कमच उपलब्ध नसते. त्यामुळे ग्राहकांना बाहेरील बँकांच्या एटीएमकडे धाव घ्यावी लागते व त्यांना त्याकरीता फुकटचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेत चौकशी केली असता एटीएम चालविण्याचे काम दुसरी एजन्सी करते असे सांगितले जात आहे. मग त्यांना वेळोवेळी सुचना देणे व वेळेवर रक्कम उपलब्ध करणे बँकेचे काम नाही का? शनिवार ते सोमवार पुर्णपणे एटीएममध्ये रक्कमच नव्हती. बँकेने स्वतः बनविलेल्या नियमानुसार एका दिवसाला जास्तीत जास्त फक्त पन्नास हजार रक्कम भरण्यास परवानगी असते. त्यापेक्षा जास्त रक्कम भरल्यास रूपये ११८ दंड भरावा लागतो. म्हणजे एखादया ग्राहकाला त्याचे खात्यामधे २ लाख रूपये भरावयाचे असल्यास दंड माफ करण्याकरीता त्याने ४ दिवस रक्कम भरणे करीता शाखेमधे त्याची इतर कामे सोडुन फेऱ्या माराव्या लागतात.

बँक ऑफ महाराष्ट्र ही जनतेची बँक जनतेच्या हितासाठी आहे की जनतेला लुटुन धंदा करण्यासाठी आहे? असा प्रश्न सध्या पडला आहे. कारण रक्कम काढावयाची म्हटले तरी सध्या स्लीप ऐवजी धनादेश घेऊनच बँक रक्कम देते. म्हणजे ग्राहकाने जास्तीत जास्त धनादेश वापरावे व त्याद्वारे बँकेचा धनादेश देण्याचा धंदा चालावा व त्यातुन नफा कमवायचे काम बँक करून ग्राहकांना लुटायचे काम बँक करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही गेल्या कित्येक वर्षापासुन नफ्यामधे असुन बँकेतर्फे कित्येक करोडो रूपयांच्या नफ्याची रक्कम केंद्र सरकारला देत आली आहे. गेल्या १० ते १५ वर्षामधे कित्येक कर्मचारी निवृत्त होऊन सुद्धा बँकेने त्यांचे ठिकाणी नवीन भरती केलेली नाही. त्या करता आताच्या कर्मचाऱ्यांनी २ ते ३ वेळा संप करून सुद्धा महाराष्ट्र बँकेने नवीन कर्मचाऱ्यांची भरती केलेली नाही. त्यामुळेच वरील सर्व अडचणी ग्राहकांना सोसाव्या लागत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ही उरणमधील सर्वात जुनी बँक असुन तेथे मोठया प्रमाणात खातेदारांची संख्या आहेत. या सर्व अडचणीमुळे कित्येक खातेदार आपली खाती इतर बँकेत हस्तांतरीत करण्याच्या तयारीत आहेत. तरी या बाबतीमध्ये उरणवासियांना उत्तम सेवा देण्याकरीता योग्य ती पावले उचलावीत अन्यथा ग्राहकांना दुसऱ्या बँकेची वाट धरल्या शिवाय उपाय नाही. अशी मागणी जनतेतून केली जात आहे. या समस्या बाबतीत हायकोर्टचे वकील तथा उरण मधील प्रसिद्ध वकील दत्तात्रेय नवाळे यांनी झोनल ऑफीस बँक ऑफ महाराष्ट्र सिडको ओल्ड ऍडम बिल्डींग, पी-१७, सेक्टर-१, वाशी नवी मुंबई ४००७०३ येथे तसेच महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य कार्यालय, १५०१, लोकमंगल, शिवाजी नगर, पुणे-४११००५ येथे पत्रव्यवहार देखील केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!