अनंत नारंगीकर
उरण : महावितरण कंपनीच्या उप अभियंत्यांच्या दुर्लक्षितपणामुळे रविंद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २७) दुपारच्या सत्रात घडली आहे. तरी महावितरण कंपनीचे बेजबाबदार उप अभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनी उरण या कार्यालयात रविंद्र पांडुरंग पाटील (रा. बोकडविरा) हे कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून मुळेखंड तेलीपाडा या परिसरात काम करत होते. शनिवारी (दि. २७) रविंद्र पाटील हे कामगार नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले होते. मुळेखंड तेलीपाडा येथील दुरुस्तीचे काम करण्यासाठी दुपारच्या सत्रात विद्युत वाहक पोलवर गेले असता त्यांना शॉक लागण्याची घटना घडली. त्यातच रविंद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी कामगाराचा दुदैवी तडफडून मृत्यू झाला आहे.
सदर घटना घडली त्यावेळी उप अभियंता राहुल शिंदे यांनी खबरदारी म्हणून विजेच्या समस्येबद्दल विद्युत पुरवठा खंडित का केला नाही? तसेच जर विद्युत पुरवठा सुरळीत चालू असताना उप अभियंता राहुल शिंदे यांनी रविंद्र पांडुरंग पाटील या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला काम करण्यास मनाई का केली नाही? आणि सदर घटना घडली त्यावेळी जबाबदार अभियंता त्या जागेवर होता का? असे सवाल उपस्थित होत असून रविंद्र पांडुरंग पाटील या कामगारांच्या मुत्यूला जबाबदार असणाऱ्या महावितरण कंपनीचे उप अभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून यापुढे अशा प्रकारची दुदैवी घटना घडणार नाही अशा प्रकारची मागणी उरणच्या जनतेतून करण्यात येत आहे.