विठ्ठल ममताबादे
उरण : उरण रेल्वे स्टेशन जमीन संपादनाच्या बदल्यात मोबदला आणि रोजगार मिळावा म्हणून उरण कोटनाका, काळाधोंडा येथील स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने व कायदेशीर व शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण आणि आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. सदर प्रकरण उरण न्यायालयात गेले. उरण न्यायालयाने सदर आंदोलकांची निर्दोष सुटका केली आहे.
उरण रेल्वे स्टेशनने नव्याने बांधकाम सन २०१३ मध्ये सुरू केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता काम सुरू केले होते. या विरोधात सर्व रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी व कोटगाव ग्रामस्थांनी २०१९ मध्ये साखळी उपोषण आणि आंदोलन पुकारले होते. त्यावेळी उरण पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडून काही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. निलेश गणपत भोईर, सुनील गजानन भोईर, कृष्णा.ल. जोशी या शेतकरी प्रकल्पग्रस्तांवर उरण पोलीस ठाण्यात सन २०२१ मध्ये भारतीय दंड विधान ३४१,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याची अंतिम सुनावणी झाली असून उरण कोर्टाचे न्यायाधीश निलेश एम. वाळी यांनी आंदोलनकर्त्यांची दिनांक २/५/२०२४ रोजी निर्दोष सुटका केली. आंदोलकांच्यावतीने उरणचे सुप्रसिद्ध वकील ॲड. पराग म्हात्रे यांनी कामकाज पाहिले. शेतकरी आंदोलनकर्त्यांची बाजू ठामपणे मांडल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. या निर्णयाचे स्थानिक कोटगाव ग्रामस्थांनी आणि उरण शहरातील नागरिकांनी स्वागत केले असून आंदोलकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
