प्रतिनिधी
सोगाव : मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथील गेटवे – एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्था मर्यादित अजंठा बोट (लॉन्च) सर्व्हिसचे चेअरमन मामु मुल्ला यांचे गुरुवार, दि. २ मे रोजी रात्री आठ वाजता मुंबईतील डोंगरी येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मुळगाव कोकणातील मंडणगड येथील असल्याने पार्थिव गावी घेऊन जात त्यांचे पार्थिवाचे अंतिम दफनविधी शुक्रवार, दि. ३ मे रोजी दुपारी त्यांच्या गावी करण्यात आले. याबद्दल अजंठा बोट (लॉन्च) सर्व्हिसच्या एलिफंटा व मांडवा प्रवाशांनी व कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई गेटवे येथून प्रवाशांना जलवाहतूक मार्गे बोटीने (लॉन्चने) एलिफंटा व मांडवा याठिकाणी जाण्या – येण्यासाठी जलवाहतुकदारांची सहकारी संस्था स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मामु मुल्ला हे दिलदार व मोठ्या मनाचे व्यक्तिमत्त्व होते, या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संस्थेच्या सर्व सभासदांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला होता. अजंठा बोटीच्या प्रवाशांना त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्यांनी दिव्यांग, आजारी रुग्णांना प्रवासात सवलत उपलब्ध करून दिली होती.