लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा गटाला धक्का; संपूर्ण शिस्ते गावाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी
मागील पाच वर्षात आम्ही आपल्या सोबत नसल्यामुळे आमचा गाव १० वर्षे मागे गेल्याची ग्रामस्थांनी व्यक्त केली खंत
अभय पाटील
बोर्ली पंचतन : धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे आज धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत आहेत आणि एकदा मतदान झालं की विरोधक पुन्हा तोंड दाखविणार नाहीत. आमची नाळ जनतेशी जोडली गेली असल्याचे वक्तव्य महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावामध्ये पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण शिस्ते ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता, आता पुन्हा शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

32 रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रचाराचा झंझावात सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असणारे संपूर्ण शिस्ते गावाने पुनःश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महमद मेमन, माजी जि. प. सदस्य शामकांत भोकरे, माजी सभापती लाला जोशी, स्वाती पाटील, देविदास कावळे, मंदार तोडणकर, दिवेआगर माजी सरपंच उदय बापट, मुख्य संघटक नंदू पाटील, ऋषिकेश गोळे, वसीम पेशमाम, बोर्ली पंचतन सरपंच ज्योती परकर, माजी सरपंच ज्योत्स्ना हेदुकर, संजीवनी श्रीवर्धनकर, अठरा गाव आगरी समाज अध्यक्ष गणेश पाटील, चिंचबादेवी देवस्थान समिती अध्यक्ष सुजित पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिस्ते गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे अखंड आगरी समाज गाव समितीचे अध्यक्ष रमेश घरत, उपाध्यक्ष संतोष कांबळे, सचिव दिपेश नाक्ती, खजिनदार दशरथ धुमाळ, माजी अध्यक्ष दशरथ मोहिते, संतोष कांबळे, गजानन चाळके, हिशेब तपासणीस राजा नाक्ती, गावपाटील जनार्दन भायदे, सखाराम पाटील, माजी उपाध्यक्ष प्रमोद नाक्ती, सरपंच चंद्रकांत चाळके, ग्रामपंचायत सदस्य वसंत कांबळे, सुधाकर कांबळे तसेच महिला मंडळ अध्यक्षा वैजयंती चाळके, उपाध्यक्ष भारती नाक्ती,माजी अध्यक्षा नीता घरत, गाव पाटलीन सुनीता भायदे, सचिव सुनीता चाळके, खजिनदार ज्योती भायदे तसेच सर्व ग्रामस्थ यांनी प्रवेश केला. प्रवेशवेळी शिस्ते गावचे माजी अध्यक्ष नाना मोहिते यांनी प्रास्ताविक मनोगतामध्ये सांगितले की, आम्ही मागील 5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन शिवसेना पक्षात प्रवेश केला पण यात आमच्या गावचे नुकसान झाले. आम्ही 10 वर्षे मागे गेलो, अशी कबुली व खंत व्यक्त केली. तर आमच्या गावामध्ये जी काही विकासकामे झाली यामध्ये रस्ते, समाज सभागृह, पाणी योजना हे केवळ सुनील तटकरे यांचेमुळे झाले आहेत असे म्हणताना विकासकामांसाठी तटकरे यांच्याशिवाय कोणताच पर्याय नाही असेही मोहिते म्हणाले.

सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की, शिस्ते गावाने पक्षामध्ये परतण्याचा निर्णय घेतला याचे आम्ही स्वागत करतो. यापुढे देखील आपण सांगाव व आम्ही ते काम करत राहावे असेच होत राहील. आपण संपुर्ण गावाने प्रवेश केल्याने वेगळी ताकद मिळाली आहे. सध्या निवडणूकीमध्ये विरोधक प्रचारासाठी फिरत आहेत. 7 मे नंतर हे पुन्हा दिसणार नाहीत तर समाजा समाजात, धर्मा धर्मामध्ये तेढ लावणारे आज धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारत असल्याची टीका तटकरे यांनी केली.