गावांना बसणार पुराचा फटका, गाळ काढण्याची मागणी
अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील चिरनेर, विंधणे, चिर्ले, वेश्वी, पागोटे, भेंडखळ परिसरातील पाणी निचरा होणाऱ्या खाड्या या वर्षनुवर्षे गाळ आणि कचरा येऊन गाळात रुतल्या आहेत. त्यामुळे सदर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पुराचा तडाखा यावर्षी बसणार आहे. तरी शासनाने खाडी पात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाचे पाणी हे नाल्या वाटे खाडीपात्रात वाहत येऊन मिळत आहे. या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ कचराही वाहून जात आहे. वर्षानुवर्ष वाहून गेलेल्या गाळाने आणि कचऱ्याने भरून गेले आहे. त्यात खाडी पात्रात खारफुटी आणि झाडेझुडपे मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा हा लवकर होताना दिसत नाही. तसेच खाडी किनाऱ्यावर वाढते अतिक्रमणे त्यामुळे पावसाळ्यात गाव परिसरात पूरस्थिती निर्माण होत आहे. यावर्षी खाडी पात्रातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतले नाही. तर यावर्षी मोठ्या प्रमाणात पुर परिस्थिती निर्माण होण्याचा संभव आहे.

वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्यावाटे गाळ आणि कचरा जाऊन खाडी पात्र हे गाळाने भरले आहे. पूर्वी शेतीसाठी यातील गाळ काढला जात होता मात्र, आत्ता खाडीच पात्रच शिल्लक राहिलेले दिसत नाही. खाडी पात्रातील गाळ जर काढला नाही तर पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होणार नाही. एकंदरी गाव परिसरात परिस्थिती जैसे थे राहणार आहे. तरी शासनाने, उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घ्यावा
-मधुकर गोंधळी
सामाजिक कार्यकर्ते
गाळाने जर खाडी पात्र भरले असेल तर कोणत्या योजनेतून ते करता येईल हे पाहून त्यावर उपाययोजना केली जाईल.
-उद्धव कदम
उरण तहसीलदार