• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाजपाला तडीपार करण्यासाठी मशाली पेटवा -युवानेते आदित्य ठाकरे

ByEditor

May 10, 2024

घन:श्याम कडू
उरण :
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला तडीपार करण्यासाठी मशाली पेटवा आणि हाथ व तुतारी वाजविण्याचे आवाहन उबाठा शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण शहरातील उरण नगरपरिषदेच्या तिर्थरुप नानासाहेब धर्माधिकारी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत केले.

युवानेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवर टिकेचा भडिमार केला. देशात भाजपा विरोधात परिवर्तनाची लाट आली आहे. त्यामुळे आपकी बार ४०० पार म्हणाऱ्या भाजपाची अवस्था २०० पण पार होणार नाही अशी झाली असल्याचे सांगितले. अनेक राज्यात केंद्र सरकारचे अत्याचार वाढले असून विरोधकांवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. प्रज्वल रेवण्णा यांनी घरातील आणि पक्षातील हजारो महिलांचा अमानुषपणे छळ करुन बलात्कार केला.अशा रेवण्णाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते.मतदान झाल्यानंतर त्याला विदेशात पळून जाण्यासाठीही त्यांनी मदत केली असल्याचा गंभीर आरोपही आदित्य यांनी भाषणातून केला.

राज्यात भाजपाने कटकारस्थान करून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील आमदारांना कारवाईची भीती दाखवून त्यांना भाजपा बरोबर घेऊन पवित्र केले. त्यामुळे भाजपा सत्तेची गाजरे खात आहेत. एकीकडे जनतेना खोटी आश्वासने द्यायची तर दुसरीकडे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देत भाजपाच्या वॉशिंगमध्ये आल्यावर ते निष्कलंक होताना दिसतात.

भाजपाने प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. या प्रश्नाबाबत केंद्र व राज्य सरकार यांना सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. गोवा विमानतळाचे नामांतर होते परंतु राज्यातील श्री छत्रपती संभाजी महाराज व लोकनेते दि. बा. पाटील विमानतळाचे नाव देण्यास जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात आहे. यावरून सदर विमानतळाला नाव देण्याचे त्यांच्या मनात नसल्याचे दिसत असल्याने आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करण्याचे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

यावेळी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोडेपणाचा पर्दाफाश केला. त्यांनी देशासाठी नेहरू व गांधी यांनी आपले सर्वस्व अर्पण केल्याचे मुद्देसूद पटवून दिले. तसेच सत्तेसाठी हपापलेल भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना जेलची धमकी देत भाजपा बरोबर घेऊन त्यांच्यावरील कारवाया थांबविल्या आहेत. परंतु आता मोदींच्या भूलथापांना मतदार फसणार नसून मावळ लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाने भकास करून ठेवला आहे. जिल्ह्यात अनेक समस्यां आजही प्रलंबित आहेत. फक्त मोठमोठ्या बढाया मारण्याचे काम भाजपा व त्यांचे सहकारी पक्ष करीत आहे. लोकसभा निवडणुकीत बारणेची बरणी फोडून वाघेरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

उमेदवार संजोग वाघेरे यांनी निवडून आल्यावर विमानतळ नामांतर, साडेबारा टक्के, हॉस्पिटल, मैदान, बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण मशाली चिन्हा समोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन मतदारांना केले.

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, रायगड संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, माजी आमदार बाळाराम पाटील, युवानेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, भावना घाणेकर, शेकापचे तालुका चिटणीस विकास नाईक, रमाकांत म्हात्रे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

By Editor

One thought on “भाजपाला तडीपार करण्यासाठी मशाली पेटवा -युवानेते आदित्य ठाकरे”
  1. भाडखाऊ, हुकुमशाही, भाजप हटाव और सुजलाम सुफलाम देश बचाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!