• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सीएनजी वाहन चालकांचे महामार्गावर हाल!

ByEditor

May 11, 2024

महामार्गावर सीएनजी पंप संख्येने कमी असल्याने वाहनचालकांना मनस्ताप

मिलिंद माने
महाड :
पेट्रोल डिझेलच्या वाहनांना पर्याय म्हणून सीएनजीवर चालणारी वाहने अनेक कंपन्यांकडून उत्पादित करण्यात आली. मात्र, सी.एन.जी. पंपांच्या कमतरतेमुळे आणि पंपांवर होत असलेल्या मनमानीमुळे सी.एन.जी. वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मे महिन्याच्या सुट्ट्या पडल्यामुळे कोकणामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्याचबरोबर कोकणात सुट्ट्यांसाठी चाकरमानी देखील दाखल झालेले आहेत. या सर्व वाहनचालकांना मुंबई गोवा महामार्गावर सीएनजी अभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून एकीकडे सीएनजी वाहनांची निर्मिती करण्यात आली. सीएनजी वाहन उत्पादनापूर्वी एलपीजीवर वाहने चालत होती. मात्र, एलपीजी धोकादायक असल्याने केंद्रीय परिवहन विभागाने एलपीजी वाहनांना बंदी आणून सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना गती दिली. यामुळे नॅचरल गॅस उत्पादित करून त्यावर चालणारी वाहने रस्त्यावर धावू लागली. सीएनजीमुळे कमी किमतीमध्ये जास्त ऍव्हरेज मिळत असल्याने सीएनजी आणि पेट्रोल अशी वाहनांची मागणी वाढू लागली आहे. मात्र, त्यामानाने सीएनजी पंपांची कमतरता असल्याने वाहनचालक आणि त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपांवर कधीकधी तासनतास उभे राहावं लागत आहे. त्यातच सीएनजी संपल्यास रांगेत उभ्या असलेल्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दरम्यान फारच कमी सीएनजी पंप आहेत. पनवेल सोडल्यानंतर पेण, रोहा, नागोठणे, माणगाव, इंदापूर, आणि पुढे थेट खेडमध्ये सीएनजी पंप उपलब्ध आहेत. नुकताच महाड आणि पोलादपूरमध्ये सीएनजी पंप सुरू करण्यात आलेला आहे. महानगर गॅसच्या माध्यमातून हे पंप सुरू झालेले आहेत. सीएनजी पंपांवर सीएनजीने भरलेल्या दिवसाला दोन ते तीन गाड्याच दाखल होत असतात. सीएनजी उपलब्ध झाल्याचे समजतात पंपाबाहेर अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. रांगेत असतानाच पंपामधील सीएनजी संपल्यानंतर वाहन चालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच अनेक वेळा वीज खंडित झाल्यास किंवा पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास सीएनजी भरण्यास आलेल्या वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागते.महाडसह मुंबई गोवा महामार्गावर धावणाऱ्या अवजड वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, रिक्षा यादेखील सीएनजीवर धावणाऱ्या असल्याने त्यांची देखील मागणी वाढलेली आहे. त्यामुळे एकाच पंपावर महाडमध्ये सध्यातरी सीएनजी उपलब्ध करताना पंपचालकाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महाडमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या महानगर गॅसच्या पंपामध्ये दिवसाला तीन गाड्या उपलब्ध होतात. यामध्ये साधारण ४०० पासून १ हजार किलोपर्यंत सीएनजी उपलब्ध होतो. सध्याच्या काळामध्ये मागणी अधिक असून महानगर गॅसकडून कमी पुरवठा होत असल्याचे देखील महाडमधील पंपाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. उपलब्ध गॅस हा केवळ तीन ते चार तास उरतो. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून पुन्हा सिंधुदुर्ग, गोवा, दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होत आहेत.

कामगारांना वेठबिगारासारखे वापरतात

महाड येथील सीएनजी पंपावर काम करणाऱ्या कामगारांना 12 तास ड्युटी करून महिन्याचे फक्त दहा हजार रुपये हातावर टेकवण्याचे काम पंप मालक करीत असल्याने कामगार अक्षरशः वैतागले असून केवळ पोटाला आधार म्हणून नाईलाजास्तव नोकरी करीत असल्याचे कामगारांच्या बोलण्यातून दिसून येते. 12 तास काम करून व डोळ्यात तेल घालून काम करावे लागत असल्याने त्यातच सुट्ट्या पैशांसाठी ग्राहकांकडे तगादा लावावा लागत असून त्यातूनच एखादा गाडी चालक पुढे आल्यास भांडण तंटे हे दररोज होत असल्याने कामगार देखील कंटाळले असून पगार वाढ न केल्यास काम सोडण्याचा अनेक कामगारांकडून प्रयत्न होत असल्याचे कामगारांच्या बोलण्यातून प्रत्यक्ष दिसून आले. १२ तास काम करून देखील कामगारांना तुटपुंजे वेतन देणाऱ्या पंप मालकाविरोधात महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, पंप मालकांचे राजकीय हितसंबंध बघता यावर कारवाई कोणी करायची? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!