• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव खिंड पावसाळ्यात प्रवासासाठी धोकादायक!

ByEditor

May 14, 2024

लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या निकृष्ट दर्जाचे काम; अवकाळी पावसात दगडी आल्या महामार्गावर

मिलिंद माने
महाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या कामामध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीने काही ठिकाणी अनेक त्रुटी ठेवल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे या कंपनीने अनेक ठिकाणी काम अर्धवट ठेवले आहे. अशाच प्रकारे महाड तालुक्यातील दासगाव खिंडीचे काम अर्धवट राहिल्याने अवकाळी पावसात या ठिकाणी दगडी कोसळल्या. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आजही कायमच आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामात महाड तालुक्यातील दासगाव खिंड नेहमी चर्चेत राहिली. सुरवातीला वनविभागाने या ठिकाणी कामाची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर खिंडीला लागून असलेल्या घरांच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर आला. हे प्रश्न मार्गी लागत असताना त्या ठिकाणाहुन दासगाव गावासाठी येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचा आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या झाडांचा प्रश्न पुन्हा उपस्थित राहिला. यामुळे गेली सहा वर्ष ही खिंड चर्चेत राहिली. अखेर चार महिन्यापूर्वी या खिंडीचे रुंदीकरण होऊन वनविभागाने दिलेल्या परवानगीनुसार रुंदीकरण करण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंडीच्या बाजूने दासगाव गावातून मुंबई दिशेला जाणारा आणि मुंबईहुन येणाऱ्या वाहनांना गावात उतरण्यासाठी दोन सर्व्हिस मार्ग आहेत. सध्या त्या मार्गाचे काम अर्धवट आहे, कारण या सर्व्हिस मार्गावर येणारी जागा ही वनखात्याची असल्याने या विभागाने फक्त काही प्रमाणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी परवानगी दिली. परंतु, सर्व्हिस रोडमध्ये येणाऱ्या जागेचे रुंदीकरणासाठी आवश्यक असणारा डोंगर फोडण्यास अद्याप परवानागी दिलेली नाही. त्यामुळे आजही खिंडीतील रस्त्याची रुंदी अर्धवट आहे.

वनखात्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंड फोडण्यास परवानगी न दिल्याने ठेकेदार कंपनी एल अँड टी ने फक्त काही प्रमाणात रस्ता बनवण्यापुरता या खिंडीमधील डोंगराचा भाग फोडत रुंदीकरण करून सोडून दिला. या अर्धवट कामामुळे सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये डोंगर भागातून दगडी सरळ रस्त्यावर येऊन कोसळल्या. नशिबाने त्यावेळी त्या ठिकाणाहुन कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा धोका टळला अन्यथा मोठी घटना घडण्यास वेळ लागला नसता. आजही त्याठिकाणी डोंगर भागातून दगडी आणि मोठ मोठी झाडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी यांना या दासगाव खिंडीबाबत अनेक नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या होत्या. या महामार्गाचे काम करणारी लार्सन अँड टुब्रो कंपनी असो की राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग असो त्यांनी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. त्यामुळे चालू वर्षाच्या पहिल्याच अवकाळी पावसामध्ये जर त्या ठिकाणी दगडी कोसळत असतील तर काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसात त्याठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल आणि होणाऱ्या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव खिंडीत डोंगरावरून दगडी आल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या अवघड वळणामुळे पावसाळ्यात वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होऊ शकतात. दासगाव खिंडीत सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दगडी कोसळून जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी पावसाळ्यात या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी भोये यांना त्या ठिकाणची परिस्थिती दाखवून दिली आहे. त्याच बरोबर खबरदारी घेण्याच्या सूचना लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे महामार्ग विभागाचे उप पोलीस निरीक्षक प्रवीण धडे यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!