• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गेट वे ते मांडवा जलवाहतूक २६ मेपासून बंद

ByEditor

May 17, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक २६ मेपासून बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. याबाबत मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग ये-जा करण्यासाठी रस्त्याने प्रवास करावा लागेल. मांडवा ते गेटवे जलवाहतूक बंद होणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या दरम्यान रो रो बोट सेवा सुरू राहणार आहे.

मांडवा ते गेटवे हा जलवाहतूक प्रवास आरामदायी आणि वेळेची बचत करणारा आहे. रस्तेमार्गे मुंबई गाठायला चार तास अवधी लागतो. जलवाहतूकद्वारे हाच प्रवास एक तासाचा होतो. समुद्रमार्गे बोटीने येताना लाटांचा आनंद घेत प्रवासी प्रवास करतात. पर्यटकही जलवाहतूकद्वारेच अलिबाग गाठत असतात. त्यामुळे सर्वच प्रवाशांना जलवाहतूक ही फायदेशीर ठरत असते. पीएनपी, मालदार, अजंठा या कंपन्यांच्या बोटी प्रवाशांना जलवाहतुकीची सुविधा पुरवीत आहे.

जूनमध्ये पावसाळा सुरू होण्याआधी आठ दिवस आधी जलवाहतूक सेवा बंद केली जाते. त्यानुसार महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने जलवाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांना पत्र देऊन वाहतूक बंद करण्याचे कळविले आहे. जलवाहतूक बंद होणार असल्याने पर्यटनावर काहीसा परिणाम जाणवणार आहे. दरम्यान, मांडवा ते भाऊचा धक्का ही रो रो बोट सेवा सुरू राहणार आहे.

पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. या काळात समुद्र खळवळलेला असल्याने बोटींना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने ही बोट सेवा बंद ठेवण्यात येत असते. यंदा २६ मेपासून या मार्गावरील सर्व बोटसेवा बंद करण्याचे निर्देश मेरीटाइम बोर्डाने दिले आहेत. त्यानुसार गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान चालणारी बोट सेवा बंद करण्यात येणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!