विश्वास निकम
कोलाड : गुरुवार दि. १६ मे २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास कोलाड परिसराला वादळवाऱ्याने मोठा तडाखा दिल्याने काही ठिकाणी घरांवरील कौले तसेच पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
रोहा तालुक्यातील काही भागांमध्ये गुरूवारी दुपारनंतर तुफान वादळ आणि अवकाळी पावसाचा रुद्रावतार पाहवयास मिळाला. अचानक सुरू झालेले वादळ बघता बघता तूफान झाले तर कोलाड परीसरात या अवकाळी पावसामुळे भातशेतीसह फळ बागायत तसेच विटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले तर पुगाव येथील काही घरांवरील तर तेथील स्मशान शेडवरचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाकण ते इंदापूर दरम्यान काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे दरम्यानच्या महामार्गावर कोणत्याही प्रकारचा अपघात अथवा झाड कोसळले नसल्याने तद्नंतर लगेचच पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली होती. सोसाट्याचा वारा आणि पाऊस त्यामुळे अंधार पडला होता. भयानक घोंगावणारा वारा त्यामुळे पुढील अंतर काही वाहनचालकांस वाहन चालवणे देखील अवघड होत असल्याकारणाने वाहतूक मंदगतीने सुरू होती.
तसेच गेली तीन दिवस दुपारनंतर वाऱ्या पावसाचा होत असलेला धुमाकूळ त्यामुळे कोलाड परिसरातील खांब, पुगाव, पुई, गोवे, मुठवली, शिरवली, कोलाड, वरसगाव, चिंचवली, तिसे येथील शेतकऱ्यां उन्हाळी भातपीक संकटात सापडले असुन कापणीला आलेले पीक अवकाळी पावसाने झोडपले असल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवस उष्णेतेचा पारा चढल्याने अंगाची लाहीलाही होत होती. त्यात लोकसभेची निवडणुक देखील असल्याने भातकापणीला बळीराजाकडून विलंब झाला असावा. मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने त्यात अधिक भर अवकाळी पावसाची त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना दिसत आहे.
गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वादळवाऱ्यामुळे कोलाड खांब परिसरात मोठा तडाखा दिल्याने काही ठिकाणी घरांवरील कौले, पत्रे उडाल्याने घरमालकांचे तसेच भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या संबंधित खात्याकडून त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.