विनायक पाटील
पेण : नुकत्याच जाहिर झालेल्या बारावी उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा निकालामध्ये जे. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा सरासरी निकाल ९५.४५ टक्के तर कला शाखेचा निकाल ७७.१४ टक्के लागला आहे. जेएसएम कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावीची परिक्षा देणाऱ्या कु. ओजस पाटील याने ६०० पैकी ५७० (९५ टक्के) गुण संपादित करत जेएसएम कनिष्ठ महाविद्यालय तसेच अलिबाग तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. कु. ओजस पाटील याला गणितात ९८, भौतिकशास्त्रात ९६, रसायनशास्त्रात ९४, संगणक विज्ञानात १९८ तर इंग्रजी विषयामध्ये ८४ गुण मिळाले आहेत. आपल्या यशाबद्दल बोलताना ओजसने सांगितले की, तो कधीही गैरहजर न राहता नियमित सर्व विषयांच्या तासिकांना आणि प्रात्यक्षिकांना उपस्थित राहत असे. कला शाखेतील कु. मानस भोपी हा विद्यार्थी महाविद्यालयात ८५ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.
विज्ञान शाखेतील ओजस पाटील ९५ टक्के (प्रथम), वेद भगत ९२.६७ टक्के (द्वितीय) आणि श्रेया मांडे ८९ टक्के (तृतीय), संयोगिता कोळी ८५.५० टक्के आणि तन्वी पाटील ८१.५० टक्के तसेच कला शाखेतील मानस भोपी ८५ टक्के (प्रथम), जान्हवी भंडारी ७६.३३ टक्के (द्वितीय) आणि जानवी माने ६९.१७ टक्के (तृतीय), सुकन्या मुकादम ६१.६७ टक्के आणि पार्थ पाटील ६०.१७ टक्के या सर्व विद्यार्थ्यांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक अजय सावंत, गुणवत्तधारक विद्यार्थ्यांचे पालक, महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.