अनंत नारंगीकर
उरण : नवघर-द्रोणागिरी नोड सेक्टर १२ येथील रहिवाशांना करण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठ्यासाठी विद्युत वाहक उपकरणे ही चक्क गटारात बसविण्याचा प्रताप महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्टसर्किटमुळे एखादी दुर्घटना घडून रहिवाशांच्या जीवीतास धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी (दि. २३) विद्युत वाहक तार पडून विधणे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहू भोईर यांच्या दुधाळ म्हशीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या संदर्भात महावितरण कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच द्रोणागिरी नोड येथील सेक्टर १२ मधिल रहिवाशांना करण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या विद्युत वाहक केबल, विद्युत उपकरणे ही चक्क गटारात बसविल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी शॉर्टसर्किटमुळे एखादी दुर्दैवी घटना घडून रहिवाशांच्या जीवितावर बेतली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न रहिवाशांकडून विचारला जात आहे.
विद्युत वाहक उपकरणे ही द्रोणागिरी नोड येथील सेक्टर १२ मधिल गटारात टाकण्याचे काम महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. तरी रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सदरची विद्युत वाहक केबल, उपकरणे इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
-दिपक भोईर
रहिवाशी तथा संपर्कप्रमुख शिवसेना (ठाकरे गट)