विश्वास निकम
कोलाड : गेली दोन दिवसापासून कोलाड परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे येथील जनता पूर्णपणे हैराण झाली असुन याविषयी कोलाड विजवितरण कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अगोदरच वारंवार वाढत चाललेल्या गर्मीमुळे जनता पूर्णपणे हैराण झाली असुन यात भरीत भर म्हणून कोलाड परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गर्मीने अंगाची लाहीलाही होत आहे. गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री लाईट गेल्यामुळे घरातून बाहेर पडून विद्युत पुरवठा पूर्ववत होण्याची वाट पाहत तासनतास ताटकळत बसून रहावे लागत आहे. यामुळे सर्वांची झोप मोड होतांना दिसत आहे.
याविषयी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून चौकशी केली असता त्यांचा फोनही नॉट रिचेबल असाच येत असल्यामुळे चौकशी तरी कोणाकडे करायची अशा प्रश्न साऱ्या जनतेला पडला आहे. वारा नाही, पाऊस नाही, विजाही चमकत नाहीत अशावेळी वारंवार दोन दोन तास लाईट बंद करण्यात येते. परंतु, धनिकांच्या कंपनीतील लाईट बंद केली जात नाही. तर वारंवार लाईट बंद करूनही लाईट बिल कमी होत नाही. दिवसेंदिवस लाईट बिलाची रक्कम वाढतच जात आहे.
वारंवार लाईट बंद करण्यात येत असल्यामुळे याचा परिणाम विद्युत उपकरणांवार होत असुन टीव्ही, फ्रीज आदी विद्युत उपकरणे बंद पडत असुन याला जबाबदार कोण? असा प्रश्न विज ग्राहकांकडून केला जात आहे.