अनंत नारंगीकर
उरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये मागील वर्षी पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वेच्या कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. मात्र, यावर्षीही उरण रेल्वे स्टेशन पाण्याखाली जाणार असल्याने रेल्वे प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र समोर येत आहे.

मुंबई शहराला जोडणारी उरण लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची वाट गेली ५० वर्षे उरणची जनता पाहत असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात मार्च २०२४ मध्ये उरण लोकल रेल्वे सेवेचा शुभारंभ केला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे मागील वर्षीच्या पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये चार ते पाच फूटापर्यंत पावसाचे पाणी शिरल्याची बाब समोर आली होती. यावेळी उरणकरांच्या स्वप्नावर रेल्वे प्रशासनाने पाणी शिंपडल्याचे चित्र समोर आले. मात्र, तरुण वर्गाने रेल्वे स्टेशनमध्ये साचलेल्या पाण्यात मुक्त संचार करत पोहण्याचा आनंद लुटला होता. यावेळी एकच धावपळ उडाली होती. मात्र, रेल्वे मंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न करता उरणची रेल्वे सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील वर्षीची पुनरावृत्ती यावर्षीच्या पावसाळ्यात होणार अशी भीती रेल्वे प्रशासनाला वाटत असल्याने खबरदारी म्हणून उरण स्टेशनमध्ये साचणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी चक्क पाच मोठाले पंप सज्ज करुन ठेवल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
उरण हा खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. उरण रेल्वे स्टेशनच्या अंडरग्राऊंडमध्ये मागील वर्षी पावसाचे पाणी साठून राहीले होते. त्यामुळे यावर्षीही पावसाचे पाणी साठून राहीले तर ते तात्काळ काढून टाकण्यासाठी खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाच्यावतीने पाच वॉटर पंप आणून ठेवले आहेत.
-गौतम कुमार
उरण स्टेशन मॅनेजर