विश्वास निकम
कोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील खरीप भात पिकाचे बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी विविध दुकानातून बियाणे, खते खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. येत्या २४ तासात मान्सून केरळमध्ये सक्रिय होईल व जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणात दाखल होईल व १५ जुनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्ग खरीप पिकाच्या मशागतीसाठी व बी बियाणे जमा करण्यासाठी तयारीला लागले आहेत.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. याचबरोबर नाचणी, वरी तसेच भेंडी, दुधी, मिरची व इतर भाजीची लागवड देखील केली जाते. यासाठी लागणारे बियाणे खरेदीसाठी शेतकरी कामाला लागले आहेत. याशिवाय यावर्षी सरासरीपेक्षा जास्त चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे, यामुळे भात लागवडीपूर्वी कमीत कमी २५ ते ३० दिवस अगोदर भाताची रोपे तयार केली जातात. यासाठी वेळेवर भात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून यासाठी बळीराजाने शेतात ट्रॅक्टर किंवा बैलाच्या सहाय्याने नांगरणी सुरु केली आहे.