अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात रविवारी (दि. २ जून) रात्री १० च्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. मात्र, खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास पहाटेचे ३.४५ वाजल्याने तालुक्यातील ३४ गावातील रहिवाशांना अंधारात उकाड्याचा सामना करत संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे.
उरण शहर, तालुक्यातील अनेक गावांना, प्रकल्प आणि व्यवसायिकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा हा खंडीत होत असल्याने त्याचा त्रास हा गोरगरीब जनतेला नाहक सहन करावा लागत आहे. त्यात अव्वाच्यासव्वा येणाऱ्या विज बिलामुळे विज ग्राहक हैराण झाले आहेत. सध्या वाढत्या उष्णतेच्या उकाड्यामुळे वीजेची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, असे असतानाही रविवारी (दि. २) रात्री १० च्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली.
मात्र, खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू होण्यास पहाटेचे ३.४५ वाजल्याने तालुक्यातील चिरनेर, भेंडखळ, विंधणे, कोप्रोली अशा एकूण ३४ गावातील रहिवाशांना अंधारात उकाड्याचा सामना करत संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे.
सोनारी, करळ येथील एसइझेड प्रकल्पाच्या कामामुळे केबल तुटल्याची घटना घडली. तसेच भेंडखळ येथेही केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली होती. मात्र, महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अंधारात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तरी रहिवाशांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे
विजय सोनावणे
उप अभियंता, महावितरण कंपनी उरण