घन:श्याम कडू
उरण : मावळ लोकसभेची मागील निवडणूक (२०१९) ही एकतर्फी होऊन शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे २ लाख १५ हजारांच्या मताधीक्याने निवडून आले होते. या वेळी मात्र मावळात अटीतटीची लढत झाली आहे, त्यामुळे महायुती (बारणे) आणि महाविकास आघाडीच्या (संजोग वाघेरे-पाटील) प्रमुख उमेदवारांनी केलेले लाखाच्या मताधिक्याचे दावे फोल ठरण्याची दाट शक्यता आहे.
मतदानाच्या चौथ्या टप्यात १३ मे रोजी मावळमध्ये ५५ टक्के मतदान झाले. गतवेळपेक्षा ते ५ टक्याने कमी झाले आहे. त्यामुळे विजयी होण्याची शक्यता असलेल्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी केलेले लाखाच्या लीडचे दावे फोल ठरणार आहेत. मतदानानंतर आठ दिवसांनी (२१ मे) बारणेंनी पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा दावा केला आहे. त्याअगोदर वाघेरेंनी विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या आधारे आपण पावणेदोन लाखाच्या लीडने विजयी होऊ, असा दावा केला होता. मात्र, हे दोन्ही दावे खरे ठरण्याची शक्यता नाही.
मावळमधील लढत ही या वेळी घासून झाली. ती गेल्या वेळेसारखी एकतर्फी झाली नाही. त्यामुळे तेथील विजयी होणारा उमेदवार हा यावेळी लाखाच्या आतील लीडनेच निवडून येणार आहे. या वेळीही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेसारखी नात्यागोत्याची आणि गावकीभावकीची झाली आहे. वाघेरे आणि बारणे दोघेही मराठा असल्याने मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नाचा अजिबात प्रभाव तेथे जाणवला नाही. उलट पुन्हा घाटावरच्या आणि पिंपरी-चिंचवडकर उमेदवारांमध्ये ही लढाई झाली. पर्यायाने पिंपरी, चिंचवड, मावळ या घाटावरील तीनही विधानसभा मतदारसंघात या दोघांनाही मतदान झाले. त्यामुळे घाटाखालील पनवेल, कर्जत आणि उरणमधून कोण किती लीड घेणार, यावरच घाटावरील या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
मंगळवारी दुपारी एकपर्यंत कळणार मावळचा खासदार
मतदानाचा अखेरचा सातवा टप्पा (१ जून) झाल्यानंतर ४ जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. मावळची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार आहे. ती विनाअडथळा झाली, तर मावळचा नवा खासदार कोण हे दुपारी १ वाजताच स्पष्ट होणार आहे, असे मावळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. तीन, साडेतीन वाजता मतमोजणीच्या सर्व २५ फेऱ्या होऊन निकाल हाती येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.