विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील प्रभाकर हॉटेलसमोर असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे एकाच दिवसात तीन दुचाकीस्वारांचा गाड्या स्लिप होऊन अपघात झाला आहे. परंतु, सुदैवाने तीनही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. या निकृष्ट रस्त्यामुळे एखाद्याचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून उपस्थित केली जात आहे.
पावसाळा संपल्यानंतर पाच महिन्यात आंबेवाडी नाका येथील उड्डाणपुलाचे काम सुरु केले नाही. परंतु, दुसरा पावसाळा सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक असताना आंबेवाडी नाक्यावरील मुख्य रस्ता बंद करुन उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले. परंतु, या अगोदर सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूचे रस्त्याचे काम हे सिमेंट काँक्रेटने पक्के केले पाहिजे होते परंतु, ते राहिले दूरच ह्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरुन वाहतूक वळविण्यात आल्यामुळे सततच्या वाहतूकीमुळे हा रस्ता खचला आहे तर काही ठिकाणच्या रस्त्याची डांबर निघून गेल्याने रस्त्याचे खडे वर आले आल्यामुळे दुचाकी स्लिप होत आहेत. पाऊस सुरु झाल्यावर या रस्त्याची काय परिस्थिती होईल हे सांगता येत नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाला १६ वर्षे पुर्ण झाली असुन या कामात कोणतेही प्रगती नाही. प्रशासनाचा बेजबाबदारपणा व ठेकेदारांचा मनमानी कारभार यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या कामासाठी लागणारी जागा उपलब्ध करण्यासाठी येथील किराणा मालाचे व्यापारी, हॉटेल, पान टपरी, कापड व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक यांना कोणतेही सवड न देता त्यांच्या दुकानावर बुलडोजर फिरवण्यात आला. काही दुकानातील सामानही काढून दिले नाही.
आंबेवाडी नाका हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असुन येथून मुंबई गोवा तसेच पुणे, रोहा, मुरुड, अलिबागकडे जाण्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते. ही वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरु केल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे खचला आहे तर काही ठिकाणी रस्त्याची डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याचे खडे वर आल्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी स्लिप होत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण निद्रावस्थेत असलेले प्रशासन व प्रशासनाचा ठेकेदारावर नसलेला वचक यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले तरी रस्त्याचे काम पुर्ण होत नाही. खचलेल्या व निकृष्ट रस्त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातुन व्यक्त केली जात आहे.